मुंबईत दिवसाही वाढू लागला गारठा; तापमानात घसरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 08:35 IST2020-01-17T01:51:27+5:302020-01-17T08:35:26+5:30
तापमान घसरल्यामुळे मुंबईसह आसपासचा प्रदेशही गारठला आहे.

मुंबईत दिवसाही वाढू लागला गारठा; तापमानात घसरण
मुंबई : राज्यातील किमान वा कमाल तापमानात गुरुवारी घसरण सुरू झाली असून, आता रात्रीच नव्हे, तर दिवसाही गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा अधिक प्रभाव आहे. गोवा व कोकणच्या तापमानातही घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ९.८ होते, तर मुंबईत १५.४ अंश तापमानाची नोंद झाली.
येत्या २४ तासांतही पुणे, मुंबईसह उत्तर महाराष्ट्र व अनेक ठिकाणी पारा खाली उतरेल. मुंबईमध्ये कमाल तापमान २६ तर किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. पुण्यात तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली उतरण्याची शक्यता असून, त्यानंतर तापमानवाढीची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. राज्यात २० जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहील.
तापमान घसरल्यामुळे मुंबईसह आसपासचा प्रदेशही गारठला आहे. बोरिवली १३, गोरेगाव १४, कांदिवली १५ व पनवेल येथे १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईत दाखल झालेली थंडी शनिवारीपर्यंत कायम राहील. माथेरान मागील काही दिवसांपासून गारठले आहे. सध्या येथे १२.४ अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
प्रमुख शहरांतील तापमान
मुंबई : १५.४ । महाबळेश्वर : १०.८ । औरंगाबाद : १५.५ । ब्रह्मपुरी : १३.६
चंद्रपूर : १५.२ । पुणे : १२.१ । मालेगाव : १३.२ । परभणी : १५.५
गोंदिया : १४.० । अहमदनगर : १३.६ । नाशिक : ९.८ । नांदेड : १२.०
नागपूर : १३.८ । सांगली : १६.६ । अकोला : १५.० । वाशिम : १५.८
जळगाव : १६ । सातारा : १४.५ । अमरावती : १५ । वर्धा : १४.४