ॲपद्वारे मैत्री करून तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १३ जणांविरोधात गुन्हा; पवई पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 14:09 IST2026-03-15T14:09:28+5:302026-03-15T14:09:42+5:30
मुंबई : एका ॲपद्वारे तरुणांना मैत्रीच्या जाळ्यात ओढून लुटणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात ...

ॲपद्वारे मैत्री करून तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १३ जणांविरोधात गुन्हा; पवई पोलिसांची कारवाई
मुंबई : एका ॲपद्वारे तरुणांना मैत्रीच्या जाळ्यात ओढून लुटणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
साकिनाक्याच्या साकीविहार रोडवरील हेवन टेरेस कॅफेमध्ये ॲपद्वारे तरुणांना बोलावून त्यांच्याकडून जबरदस्तीने मोठे बिल वसूल केले जात होते. मिळालेल्या माहितीवरून, पोलिस निरीक्षक सुशांत बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. टिंडर ॲपवरील मुलीशी संपर्क साधून तिला भेटण्यासाठी बनावट ग्राहक म्हणून पंकज यादव यांना साकीविहार रोडवर पाठवले. त्यानंतर, मुलगी कारमध्ये बसून त्यांना कॅफेमध्ये घेऊन गेली. काही वेळानंतर पोलिसांनी छापा टाकला असता, ग्राहकाकडून जबरदस्तीने २५ हजार रुपयांचे बिल मागितले जात होते, ग्राहकांना महागड्या दारूच्या नावाखाली पाणी देऊन मोठे बिल आकारले जात असल्याचे आढळले.
दारूसह मुद्देमाल जप्त
पोलिसांनी बारमधील दारूच्या बाटल्या, बिलिंग मशिन, सीसीटीव्ही डीव्हीआर, संगणक आणि बिल पावत्या जप्त केल्या. तसेच संबंधित कॅफेला दारू पुरवण्याचा परवाना नसल्याचेही निष्पन्न झाले.
मुंबईसह दिल्लीमध्येही टोळीचा उच्छाद सुरूच
या प्रकरणात आशमीन मलिक (२४), परी उपाध्याय (१८), निहारिका कौर (२२) यांच्यासह मोहसीन जायद हुसेन खान (२८), मयंक गुलचंद कतुरिया (२०), मयूर डिडोळे (२७), नितेश आमडसकर, जतीन कुमार (२४), फैजल अब्दुल सलाम अली (२७), दीपक दास (३७), साहिल कुषवाह (१९), शाेयब आणि आजीम सिद्दिकी (३५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील आश्विन परी आणि निहारिका या दोघी टिंडर ॲपवर पुरुषांना गोड बोलून जाळ्यात ओढत कॅफेत घेऊन यायच्या. दिल्लीतील शोयब आणि अजीम नावाच्या व्यक्तींच्या मदतीने टिंडरवर ग्राहकांशी संपर्क साधत असल्याचेही उघड झाले.