मुंबई : मध्य रेल्वेने परदेशी पर्यटक कोट्याचा गैरवापर रोखण्यासाठी मोहीम तीव्र करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ३९ प्रकरणे उघडकीस आली असून, १२१ प्रवाशांकडून ३ लाख ५६ हजार ९१६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
संगमित्रा एक्सप्रेसमध्ये ४ फेब्रुवारी २०२६ रोजी काही भारतीय प्रवासी परदेशी पर्यटक कोट्यातील तिकिटांवर आवश्यक कागदपत्रांशिवाय प्रवास करताना आढळल्याने प्रकरण समोर आले होते. त्यानंतर मध्य रेल्वेने याची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान परदेशी पर्यटक कोट्यातील बुकिंगचीतपासणी केली असता २४ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत ३१ गाड्यांमध्ये १७४ पीएनआर या कोट्यातून बुक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तिकीट तपासणी पथकांनी विशेष मोहीम राबवून पडताळणी केली असता ३९ पीएनआरमध्ये गैरवापर झाल्याचे उघड झाले आणि १२१ प्रवासी नियमबाह्य प्रवास करताना आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘ते’ तिकीट रद्द
कोट्याचा गैरवापर करून तिकीट बुक केलेल्या प्रवाशांची आरक्षित तिकिटे रद्द करत त्या सीट आरएसी व प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना देण्यात आल्या. या प्रकरणात अधिकृत एजंटांचा सहभाग आहे का, याबाबत आयआरसीटीसीकडून माहिती मागवली असून, पुढील तपास सुरू आहे.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अपात्र कोट्यातून तिकीट बुक करणे हे रेल्वे कायदानुसार दंडनीय असून, प्रवाशांनी तिकिटाच्या कोट्यानुसार आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.