"मुंबईत दिसलास तर एन्काऊंटर करुन टाकू"; पोलीस असल्याचे भासवून लुटले ५० लाख, भुलेश्वरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:44 IST2025-06-23T16:43:55+5:302025-06-23T16:44:14+5:30
मुंबई पोलीस असल्याचे भासवून ५० लाख रुपये लुटणाऱ्या पाच जणांना अटक लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अटक केली.

"मुंबईत दिसलास तर एन्काऊंटर करुन टाकू"; पोलीस असल्याचे भासवून लुटले ५० लाख, भुलेश्वरमधील घटना
Mumbai Crime:मुंबईतून दरोड्याची मोठी घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या नावावर धमकावून ५० लाख रुपयांची लूट करणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली. एका व्यक्तीचे अपहरण करून त्याच्याकडून ५० लाख रुपये लुटल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाच जणांना अटक केली. आरोपींनी त्या व्यक्तीला फेक इन्काऊंटरमध्ये जीवे मारण्याची धमकीही दिली होती. दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात रविवारी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सहा तासांच्या आत पोलिसांनी पुणे, सातारा आणि ठाण्यातून आरोपींना अटक केली.
अजय बाळकृष्ण लोखंडे (३२), रेवणसिद्ध राजाराम जावडे (२७), सागर दामोदर जाधव (२९), विकास अंकुश देहाळे (३८, सर्व रा. सांगली), दिलीप काशिनाथ ढेकळे (४३, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार भुलेश्वरमधील पोपलवाडी परिसरातून जात असताना ही घटना घडली. पोलिस अधिकारी असल्याचा दावा करत चार जणांना त्याला अडवले. चौघांनीही त्या व्यक्तीला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि त्याचे अपहरण केले.
आरोपींनी त्याला चाकू धाक दाखवत तुला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. आरोपींनी त्याची ५० लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली आणि त्याच्या मोबाईल फोनमधून सिम कार्ड काढून त्याला नवी मुंबईतील खारघरला रस्त्याच्या कडेला उतरवले. आरोपींनी तक्रारदाराला मुंबईत परत येऊ नको, दिसलास तर तुला फेक इन्काऊंटरमध्ये संपवून टाकू अशी धमकीही दिली. त्यानंतर ती व्यक्ती मुंबईत परतली आणि लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरु केला. सुरुवातीला या प्रकरणात पुण्यातील दोन संशयितांचा सहभाग असल्याचे समोर आले. पुणे पोलिसांच्या मदतीने त्यांना खेड शिवापूर येथून अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून पोलिसांना उर्वरित आरोपींपर्यंत पोहोचता आले. माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणे-सातारा महामार्गावरून आणखी दोन आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली. पुढील तपासात पाचव्या आरोपीचा सहभाग असल्याचे उघड झाले, ज्याला नंतर ठाण्यातील शांतीनगर परिसरातून अटक करण्यात आली.
दरम्यान, पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी, ३९ लाख रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे.