मुंबईत सराफाला २० लाखांची धमकी; 'लालपरी' कोडवर्ड वापरून खंडणी स्वीकारताना चौघांना फिल्मी स्टाईल अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 19:31 IST2026-02-19T19:12:17+5:302026-02-19T19:31:53+5:30
जोगेश्वरीतील सराफाला धमकावून पैसे मागणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली.

मुंबईत सराफाला २० लाखांची धमकी; 'लालपरी' कोडवर्ड वापरून खंडणी स्वीकारताना चौघांना फिल्मी स्टाईल अटक
Mumbai Crime: मुंबईतील विलेपार्ले येथील एका नामांकित सराफाला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देऊन २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर सापळा रचून विलेपार्ले पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली. धक्कादायक म्हणजे, या व्यवहारासाठी लालपरी हा विशेष कोडवर्ड वापरण्यात आला होता.
नेमकी घटना काय?
विलेपार्ले (पूर्व) येथे दागिन्यांचे दुकान चालवणारे ४६ वर्षीय सराफ अजित जैन यांना १२ फेब्रुवारीपासून व्हॉट्सॲपवर धमकीचे मेसेज येऊ लागले होते. या मेसेजमध्ये स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँग कॅनडाचे सदस्य असल्याचे सांगून २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैसे दिले नाहीत तर तुझेही तेच हाल होतील जे सध्या देशात सुरू आहेत," अशा शब्दांत त्यांना धमकावण्यात आले होते.
५ लाखांचा डिल आणि लालपरी कोडवर्ड
धमकीनंतर घाबरून न जाता जैन यांनी तातडीने विलेपार्ले पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गाबाजी चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींना जाळ्यात ओढण्याची योजना आखली. वाटाघाटीनंतर आरोपी ५ लाख रुपये घेण्यास तयार झाले. आरोपींनी पैशांच्या डिलिव्हरीसाठी मंगळवारी दुपारी २ वाजता कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरील एका रेस्टॉरंटच्या पार्किंगची जागा निवडली. आरोपींनी अट घातली होती की, पैसे घेणारा व्यक्ती तिथे येऊन लालपरी हा कोडवर्ड दोनदा बोलेल, त्यानंतरच त्याला पैसे द्यायचे.
फिल्मी स्टाईल पाठलाग आणि अटक
ठरल्याप्रमाणे, पोलिसांनी साध्या वेशात संपूर्ण परिसरात सापळा रचला होता. दुपारी ४:३० च्या सुमारास चार तरुण तिथे आले. त्यांनी दोनदा लालपरी असा कोडवर्ड उच्चारून जैन यांच्या कर्मचाऱ्यांकडून ५ लाख रुपयांची बॅग घेतली. पैसे घेऊन ते रिक्षातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांचा २०० मीटरपर्यंत पाठलाग केला आणि चौघांच्याही मुसक्या आवळल्या. अटक केलेले दीपक नरेंद्र डांगोल आणि फैजान फिरोज खान हे दोघेही पुण्याचे रहिवासी आहेत. तर मजिद साजिद खान आणि साहिल इलियास शेख हे दोघेही गोवंडी येथे राहणारे आहेत.
पोलीस तपासात समोर आले की, या गुन्ह्याचा मास्टरमाइंड झारखंडमधील धनबाद येथे बसला आहे. इम्तियाज आणि वशीर नावाच्या दोन व्यक्तींच्या सांगण्यावरून हे चारही आरोपी काम करत होते. आरोपींनी खरोखरच बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा दावा केला होता की केवळ नावाचा वापर केला, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच सराफाचा नंबर या आरोपींना कोणी दिला, याचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांनी आरोपींकडून ५ लाख रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन जप्त केले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.