दिवाळीत ‘ते’ रुग्ण घर सोडून जातात मुंबईबाहेर, वायूप्रदूषण त्यात दिवाळीतील फटाक्यांच्या आवाजाचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 13:33 IST2023-11-08T13:33:02+5:302023-11-08T13:33:15+5:30

अगोदरच हाताबाहेर गेलेले वायू प्रदूषण त्यात दिवाळीच्या फटाक्यांमुळे होणाऱ्या धुराची त्यात भर पडल्यामुळे हवा आणखीच अशुद्ध होते.    

During Diwali, 'those' patients leave their homes outside Mumbai, air pollution and the sound of crackers during Diwali. | दिवाळीत ‘ते’ रुग्ण घर सोडून जातात मुंबईबाहेर, वायूप्रदूषण त्यात दिवाळीतील फटाक्यांच्या आवाजाचा त्रास

दिवाळीत ‘ते’ रुग्ण घर सोडून जातात मुंबईबाहेर, वायूप्रदूषण त्यात दिवाळीतील फटाक्यांच्या आवाजाचा त्रास

मुंबई : शहरातील प्रदूषणाच्या या माहोलमध्ये दिवाळीचा सण साजरा होत असताना राज्यातील सर्वच यंत्रणांनी दिवाळी करताना काळजी घ्या, अशा सूचना केल्या आहेत. अगोदरच हाताबाहेर गेलेले वायू प्रदूषण त्यात दिवाळीच्या फटाक्यांमुळे होणाऱ्या धुराची त्यात भर पडल्यामुळे हवा आणखीच अशुद्ध होते.    
ज्या रुग्णांना अस्थमा, श्वसनविकार, रक्तदाब, हृदयविकार आणि अर्धांगवायू या व्याधींचा त्रास आहे, या रुग्णांना दिवाळीच्या फटक्यांच्या आवाजापासून, त्यातून निर्माण होणाऱ्या धुरापासून त्रास होतो. अशा प्रसंगी ते तक्रारी करत बसण्यापेक्षा दिवाळीचे चार-पाच दिवस शहराबाहेर लांब जाऊन प्रदूषणमुक्त आणि गोंगाट नसणाऱ्या जागी राहणे पसंत करत असल्याचे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

का वेळ येते घर सोडण्याची...
अनेकवेळा रुग्णांना या फटाक्याच्या होणाऱ्या त्रासाची दखल घेत काही नागरी वसाहतीतील मुले आणि तेथील नागरिक मोकळ्या परिसरात जाऊन फटाके वाजवून दिवाळी साजरी करीत असतात. कारण हौसिंग सोसायट्यांमध्ये फटाके लावल्याने हा आवाज घुमतो आणि त्याचा  रुग्णांना त्रास होतो. केवळ रुग्णांना याचा त्रास होतो असे नाही, तर यामुळे अनेकदा ज्येष्ठ नागरिकांचीही या काळात चिडचिड वाढते. या काळात अनेकांची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे त्यांच्या नाडीचे ठोके वाढतात. छातीत धडधड सुरू होते, याचा हृदयाच्या आजारावरसुद्धा विपरीत परिणाम होतो.  ज्या रुग्णांना घराबाहेर पडता येत नाही, ते स्वतः त्या काळात घरातच थांबून दिवाळी साजरी करत असतात. 

रुग्णांनी शक्य असल्यास मास्क लावावा
गेल्या अनेक वर्षांपासून अस्थमाचे आणि श्वसन विकारांचे रुग्ण यांना शहरातील  बंदिस्त वातावरणात राहायचे नसते. या काळात त्यांना शहराबाहेर बाहेर हलवतात. ज्या ठिकाणी प्रदूषण आणि विनाकारण आवाजाचा गोंगाट नाही, त्या ठिकाणी पाच-सहा दिवस हे रुग्ण राहतात आणि दिवाळी संपली की परत येतात.

Web Title: During Diwali, 'those' patients leave their homes outside Mumbai, air pollution and the sound of crackers during Diwali.