आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 02:44 IST2020-10-02T02:43:59+5:302020-10-02T02:44:30+5:30
मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका
मुंबई : मराठा आरक्षणाची लढाई मोठी आहे. या लढ्यात तुमचे असणे आवश्यक आहे. त्यामुळे युवकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून गुरुवारी करण्यात आले.
बीड येथील तरुण विवेक रहाडे या विद्यार्थ्याने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर दादर येथील सूर्यवंशी सभागृहात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला होता. तुम्हीच आत्महत्या करणार असाल तर त्या आरक्षणाचा उपयोग काय, असा सवाल करीत संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.
१० आॅक्टोबरला संप नाही
कोरोनासह सद्य:स्थिती पाहता १० आॅक्टोबरला पुकारलेल्या बंदमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा सहभाग नसेल. यासंदर्भात नाशिक येथील बैठकीत स्पष्ट भूमिका घेण्यात आली. ज्यांनी बंदची हाक दिली त्यांनाही बंद पुकारू नये, असे आवाहन आणि विनंती करण्यात आल्याचे मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.