Join us  

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी नको, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 2:26 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ६ डिसेंबर रोजीच्या  महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही अनुयायांना अभिवादनासाठी मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे. या भूमिकेचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वागत केले. तसेच समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांच्या कार्यवाहीबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले. त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले दैवत आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांची प्रगल्भता कृतीतून दाखविण्याची ही वेळ आहे. या कठीण काळात आपण जिथे आहात तिथूनच अभिवादन करा.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :उद्धव ठाकरेदादर स्थानक