‘मध्ये येऊ नका, तुम्हालाही मारून टाकेन’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 11:55 AM2023-08-01T11:55:38+5:302023-08-01T11:55:38+5:30

​​​​​​​चेतन सिंह प्रत्येक वेळी जबाब बदलत असल्याची माहिती समोर येत आहे. या तफावतीमुळे हत्याकांडामागच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. 

"Don't come in, I'll kill you too" | ‘मध्ये येऊ नका, तुम्हालाही मारून टाकेन’

‘मध्ये येऊ नका, तुम्हालाही मारून टाकेन’

googlenewsNext

मुंबई: चेतन सिंहने चार जणांची हत्या केली, तेव्हा त्याचे सहकारी आरपीएफ कॉन्स्टेबल जयप्रकाश यादव आणि प्रवीण तमांग हे  जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये होते. पण, त्याने त्यांच्यावर गोळीबार केला नाही. मात्र, “तुम्ही माझ्यामध्ये येऊ नका; नाहीतर, तुम्हालाही मारून टाकेन,” असे त्याने धमकावले. चिंतेची बाब म्हणजे त्यावेळी दोन्ही हवालदारांकडे फक्त लाठी-काठी होती.

माहितीत तफावत
चेतन सिंह प्रत्येक वेळी जबाब बदलत असल्याची माहिती समोर येत आहे. या तफावतीमुळे हत्याकांडामागच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. 

बंदूक घेऊन पळाला; खारफुटीत लपला
मीरारोड स्टेशन मास्टरने जीआरपी अधिकाऱ्यांना अलर्ट केले आणि मीरारोड स्टेशनच्या आधी ट्रेन २०० मीटरवर पोहोचली, तेव्हा आरोपी सिंहने ट्रेनमधून उडी मारली.  तो बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. दोन जीआरपी कॉन्स्टेबल दिलीप पवार आणि किरण गायकवाड यांनी सिंहला रेल्वे ट्रॅकवरून बंदूक घेऊन पळताना पाहिले. सिंह जवळच्या ट्रॅक एरियात खारफुटीत लपून बसला, तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग केला. सिंह पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, तो मीरारोड स्टेशनवर पोहोचला. त्यावेळी दोन्ही कॉन्स्टेबलनी त्याला पकडले.

असे घडले सुपरफास्ट पॅसेंजरमधील हत्याकांड
मध्यरात्री २:४८ : जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर सुरत रेल्वे स्थानकात पोहोचली.
मध्यरात्री २:४९ : आरोपीने एएसआय टिकाराम मीना यांना तब्येत ठीक नसल्याचे सांगितले.
मध्यरात्री २:५५ : मीना यांनी चेतनला आराम करायला सांगितले.
पहाटे ४:०२ : आरोपीला जाग आली आणि पुन्हा कंबर, पाठदुखीचे कारण देत मीना यांना त्याने घरी पाठविण्याची विनंती केली.
पहाटे ४:०८ : तोवर चेतनचे पत्नीशी फोनवर भांडण.
पहाटे ४:१५ : आरोपीकडून मीना यांना पुन्हा घरी पाठविण्याची विनंती. ती नाकारल्याने दोघांचे भांडण.
पहाटे ५:२३ : संतापलेल्या चेतनचा तीन डब्यांत जाऊन मीना आणि अन्य तीन प्रवाशांवर गोळीबार.
पहाटे ५:३० : एका प्रवाशाने चेन खेचली आणि गाडी थांबवली. तेव्हा चेतनचा पळण्याचा प्रयत्न. आरपीएफ जवान, पोलिसांनी केला पाठलाग. 
सकाळी ६:१८ : जयपूर सुपरफास्ट पॅसेंजर बोरीवली रेल्वे स्थानकावर पोहोचली. काही मिनिटांत ती रवाना करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवले.

असगर यांच्या छातीत तीन गोळ्या
मूळचे बिहारच्या मधुबनी येथील रहिवासी असलेले असगर अब्बास शेख (४८) हे कामाच्या शोधात जयपूरहून मुंबईला येत होते. असगर यांना चार मुले आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कामासाठी ते मुंबईत येत होते. चेतनने असगर यांच्यावर तीन गोळ्या झाडल्याचे त्यांचे भाऊ मोहम्मद अनाउल्ला शेख यांनी सांगितले. रेल्वेकडून या हत्याकांडाची माहिती मिळताच त्यांना धक्का बसला. पोलिसांनी व्हिडिओ कॉल करून मृतदेह दाखवला. तेव्हा त्यांच्या भावाच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्याचे दिसून आले.  आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणीही अनाउल्ला यांनी केली.

फॉरेन्सिक टीमकडून चार तास तपासणी
जयपूर सुपरफास्ट पॅसेंजर मुंबई सेंट्रलला कारशेडला आणल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास फॉरेन्सिक टीमने हत्याकांड घडलेल्या डब्यांची तपासणी केली. जवळपास चार तास तपासणी करत पुरावे ताब्यात घेतले आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविले. 

उच्चस्तरीय समितीकडून चौकशी 
बी ५, एस ६ आणि पेंट्रीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. बोरिवली रेल्वे स्थानकावर चारही मृतदेह पोलिसांच्या मदतीने उतरवण्यात आले. नंतर ते शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. रेल्वेत अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी योग्य काळजी घेतली जाणार आहे. रेल्वेच्या उच्चस्तरीय समितीमार्फत या दुर्घटनेची चौकशी केली जाणार आहे. 
-  सुमित ठाकूर, जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे 

जबाब नोंदवून प्रवाशांना उतरवले
तीन डब्यांत गोळीबार करून पळून जाणाऱ्या चेतनला पोलिसांनी पकडल्यानंतर गाडी बोरिवलीला थांबवण्यात आली. तेथे आणि मुंबई सेंट्रलला काही प्रवासी उतरले. ज्या डब्यात दुर्घटना घडली, त्यातील प्रवाशांचे जबाब नोंदवून घेण्यात आले. रेल्वे दुर्घटनेतील चारही जणांचे मृतदेह बोरिवली स्थानकात उतरविण्यात आले. तेथे लगेच रुग्णवाहिका मागवण्यात आली आणि शवविच्छेदनासाठी ते शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र हे मृतदेह उघड्यावर ठेवल्याचा आरोप रेल्वे अधिकाऱ्यांनी फेटाळला. रुग्णवाहिका येईपर्यंत काही काळ मृतदेह फलाटावर ठेवल्याचे ते म्हणाले. मात्र तेव्हाही पुरेशी काळजी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

गोळीबारात मरण पावलेल्यांच्या कुटुंबातील एकाला रेल्वने नोकरी द्यावी, तसेच आर्थिक मदत करावी, अशी मागणी करत शताब्दी आणि जेजे रूग्णालयाच्या परिसरात मृतांच्या नातलगांनी रात्री आंदोलन केले. जोवर ही मागणी पूर्ण होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. बिहारमधून नोकरीच्या शोधात आलेल्या असगर यांच्या कुटुंबीयांचाही त्यात समावेश होता. असगर यांना पाच मुले आहेत.
 

Web Title: "Don't come in, I'll kill you too"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.