Join us  

गोपीचंद पडळकरांना 'दुहेरी' धक्का; धनगर समाजाच्या 'या' नेत्याने घेतली विरोधी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 6:43 PM

धनगर समाजाचे आणखी एक नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील गोपीचंद पडळकरांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

मुंबई: धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं वादग्रस्त विधान केले होते. गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहे. 

गोपीचंद पडळकरांच्या शरद पवारांवरील विधानानंतर धनगर आरक्षण लढ्याचे मुख्य प्रवर्तक उत्तम जानकर यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता धनगर समाजाचे आणखी एक नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील गोपीचंद पडळकरांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

प्रकाश शेंडगे म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केलं आहे, ते त्यांच वैयक्तिक मत आहे. ती संपूर्ण धनगर समाजाची भूमिका नाही. तसेच बहुजन समाजातील नेते संपवणे हे भाजपाचे पाप आहे, असा आरोप देखील प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न दिल्लीतूनच सुटणार आहे. भाजपची केंद्रात सत्ता आहे. मग धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाहीत असा सवालही प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला आहे. उत्तम जानकर यांच्यासह आता प्रकाश शेंडगे यांनी देखील गोपीचंद पडळकरांवर टीका केल्याने गोपीचंद पडळकरांना दुहेरी धक्काच बसल्याचे बोलले जात आहे.

तत्पूर्वी, गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामुळे धनगर समाजाची मानहानी झाली आहे. शिवाय आरक्षणाचा मुद्दा ही बाजूला गेला आहे. त्यामुळे अशा बेताल व्यक्त करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना यापुढे आरक्षण लढ्यात कुठे सहभागी करून घेतले जाणार नाही, असं उत्तम जानकर यांनी स्पष्ट केले आहे.

 गोपीचंद पडळकर यांनी नक्की काय विधान केलं-  

शरद पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. फडणवीसांनी धनगरांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पाच वसतिगृह, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या निर्णयाचा समावेश आहे. मात्र यासाठी सध्याच्या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर आम्हाला बोलावं लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं.

टॅग्स :गोपीचंद पडळकरशरद पवारभाजपादेवेंद्र फडणवीसधनगर आरक्षणराष्ट्रवादी काँग्रेस