Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २७.३८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी; आतापर्यंत ८३ टक्के पात्र खातेदारांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 06:33 IST

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र शेवटच्या शेतकºयांपर्यंत योजनेचा लाभ देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी २० जुलै अखेर २७.३८ लाख खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत एकूण प्रसिद्ध केलेल्या पात्र खातेदारांच्या यादीतील ८३ टक्के खातेदारांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र शेवटच्या शेतकºयांपर्यंत योजनेचा लाभ देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. योजनेत ज्या पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ देणे बाकी आहे. त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबविली जावी, जिल्हाधिकाºयांनी या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी २१ हजार ४६७ कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यापैकी १७ हजार ६४६ कोटी रुपयांचा लाभ शेतकºयांना कर्जमुक्ती योजनेतून देण्यात आला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात जवळजवळ १९ लाख खातेदारांना ११ हजार ९९३ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण ५६५३ कोटी रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात जमा आली आहे. यादीतील उर्वरित ५.५२ लाख खातेदारांनी प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांना लाभ मिळेल.

राज्यात कर्जमुक्तीची प्रक्रिया पुन्हा सुरू

मार्च २०२० मध्ये काही जिल्ह्यांत निवडणूक जाहीर झाल्यामुळे लागू झालेली आचारसंहिता व त्यानंतर कोविड-१९ महामारीमुळे काही ठिकाणी कर्जमुक्तीचा लाभ देणे शक्य झाले नव्हते. परंतु आता प्रक्रिया पुन्हा सुरु झालेली आहे, असे सहकार विभागाने सांगितले.

टॅग्स :शेतकरीमहाराष्ट्र सरकार