'लुटलं दादर, भुषवली मोठी पदं तरीही...'; मनसेनं समाधान सरवणकरांची काढली अक्कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 17:45 IST2025-04-02T17:44:27+5:302025-04-02T17:45:23+5:30
राज ठाकरे यांनी गंगेच्या दूषित पाण्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्यानंतर समाधान सरवणकर यांनी बॅनर लावत डिवचलं. त्यावर मनसेच्या उपाध्यक्षांनी सरवणकरांची अक्कलच घाण असल्याचे म्हणत उत्तर दिले.

'लुटलं दादर, भुषवली मोठी पदं तरीही...'; मनसेनं समाधान सरवणकरांची काढली अक्कल
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी गंगेच्या दूषित पाण्याचा उल्लेख केला. आधी मांडलेल्या भूमिकेवरून ज्यांनी टीका केली होती, त्यांनाही राज ठाकरेंनी सुनावलं. गुढीपाडव्याच्या सभेतील विधानानंतर शिवसेनेचे समाधान सरवणकर यांनी मुंबई शिवसेना भवनाबाहेर एक बॅनर लावला. 'गंगा शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचे काय?', अशा शब्दात सरवणकर यांनी राज ठाकरेंना डिवचले. त्याला उत्तर देताना मनसेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी खडेबोल सुनावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एकनाथ शिंदेचे महाकुंभ मेळ्यातील फोटोंचा बॅनर माजी आमदार सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांनी लावला. शिवसेना भवनाबाहेर लावलेल्या या बॅनरमधून राज ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले. गंगेंचं पाणी शुद्ध राहिले नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्याला उत्तर म्हणून हा बॅनर लावला गेला.
मनसेने समाधान सरवणकरांना काय दिले उत्तर?
मनसेचे उपाध्य यशवंत किल्लेदार यांनी एक कविता पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी समाधान सरवणकरांचा उल्लेख केला असून, अक्कल घाण असल्याचेही म्हटले आहे.
"दादरकरांच्या देतो डोक्याला ताण,
म्हणतो हिंदुत्त्व आमची शान,
लोकांना मुर्ख बनवून घालतोय धुमशान,
दादरकरांचे बाजूला ठेऊन प्रश्न,
लुटलं दादर, भुषवली मोठी पदं
तरीही होत नाही ह्याचं 'समाधान'
अक्कल ह्याची नुसतीच घाण,
गंगेचं पाणी शुद्ध समजत असेल
तर करावं मिठी नदीत स्नान!"
अशी उत्तर देणारी कविता यशवंत किल्लेदार यांनी पोस्ट केली आहे. त्याचबरोबर "समाधान सरवणकरांसारखं ज्या लोकांना वाटत असेल की, गंगेचं पाणी शुद्ध आहे. त्यांनी धर्माच्या नावावर मिठी नदीत सुद्धा डुबकी मारायला हरकत नाही आणि त्याचेही फोटो भूषण म्हणून प्रदर्शित करावे", अशा शब्दात किल्लेदार यांनी सरवणकरांना सुनावले आहे.