संकटाची परिस्थिती हीच संधी; लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 07:31 IST2026-03-31T07:31:43+5:302026-03-31T07:31:43+5:30
उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुखांना आदेश

संकटाची परिस्थिती हीच संधी; लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा
मुंबई : राज्यातील बहुतेक लोक सत्तेत असून विरोधी पक्षाची भूमिका आपल्याला प्रभावीपणे पार पाडायची आहे. सरकारने विविध योजनांची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत जनजागृती करावी. सध्या परिस्थिती संकटाची असली तरी त्याकडे संधी म्हणून पाहावे. लोकांचे प्रश्न हाती घेऊन रस्त्यावर उतरा, अशा सूचना उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जिल्हाप्रमुखांना केल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात उपक्रम राबवून मुंबईच्या नगरसेवकांकडे त्यांनी निरीक्षकांची जबाबदारी निश्चित केली आहे.
हे आहेत निरीक्षक
धर्मेंद्र काळे (ठाणे जिल्हा), सचिन पाटील (पालघर), अंकित प्रभू (रायगड), गीतेश राऊत (रत्नागिरी), सुरेश पाटील (सिंधुदुर्ग), सचिन पडवळ (वर्धा), निशिकांत शिंदे (चंद्रपूर), रमाकांत रहाटे (अमरावती), सुहास वाडकर (नाशिक), आशिष चेंबूरकर (छत्रपती संभाजीनगर), जितेंद्र वळवी (नंदुरबार), सदा परब, चंगेज मुलतानी (अहिल्यानगर), किरण तावडे (नागपूर), विठ्ठल लोकरे (गडचिरोली), हरी शास्त्री (वाशिम), सोमनाथ सांगळे (पुणे), उदय दळवी (कोल्हापूर), राजू पाटील (परभणी), सुनील पाटील (धाराशिव), मुकेश साळुंके (लातूर).
'या मुद्द्यांवर आवाज उठवा'
जीवनावश्यक वस्तू, गॅस सिलिंडर, इंधनाचा तुटवडा जाणवत असून अशा मुद्द्यांवर आवाज उठवावा. तर जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबवून नागरिकांशी संपर्क वाढवावा. जुन्या शिवसैनिकांना सोबत घेऊन अन्य वेगळे उपक्रम राबवावेत. त्याची माहिती येत्या चार दिवसांत पक्षाकडे द्यावी, असे ठाकरे यांनी सांगितले.