‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 05:47 IST2025-05-02T05:47:31+5:302025-05-02T05:47:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; वेव्हज २०२५ परिषदेचे जगभरातील सेलिब्रिटींच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन

‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
मुंबई : भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिव्हिटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. येत्या काही वर्षांत भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील ॲनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून, पुढील १० वर्षांत ते दुप्पट होईल, असे मानले जाते. भारताच्या ॲनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे यशाचे दार उघडले जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले.
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात ‘वेव्हज’ परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते.
विदेशी प्रेक्षक सबटायटल्ससह भारतीय कंटेंट पाहतात. परदेशी प्रेक्षक भारतीय चित्रपट केवळ बघत नाहीत, तर समजून घेण्याचा प्रयत्न करतात. भारत फिल्म, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फॅशन आणि म्युझिक यांचे जागतिक केंद्र बनले असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
‘माणसाला यंत्र बनू द्यायचे नाही’ : माेदी
आपल्याला माणसाला यंत्र बनू द्यायचे नाही, तर त्याला अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवायचे आहे. माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही तर त्यासाठी संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्त्व द्यावे लागेल.
क्रिएटिव्ह व्यक्ती त्यांच्यातील ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे आपल्यातील सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त करून जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह लोकांनी भारताला सर्जनशीलतेचे केंद्र बनवावे.
आज जग नवीन पद्धतीने कथा, संकल्पना सांगण्याचे मार्ग शोधत आहे. अशा वेळी भारताकडे हजारो वर्षांचा जागतिक स्वरूपाचा कथा, संकल्पनांचा अमूल्य ठेवा आहे. या खजिन्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे आणि येणाऱ्या पिढीसमोर त्याचे सादरीकरण नव्या व रंजक पद्धतीने करण्याची गरज आहे.
वेव्हज पुरस्कारही सुरू करणार : मोदी
भविष्यात वेव्हज पुरस्कारही देण्यात येणार आहेत. आपल्याला जगाचे मन जिंकायचे आहे. विकसित भारताचा प्रवास आता सुरू झाला आहे. आज भारत बिलियन प्लस लोकसंख्येसोबतच बिलियन प्लस गोष्टींचाही देश आहे.
भारतातील प्रत्येक गल्लीत कहाणी आहे. प्रत्येक पर्वत एक गीत आहे. प्रत्येक नदी गुणगुणते. प्रत्येक गावात गोष्टी सांगण्याची वेगळी पद्धत आहे. आमच्याकडे संगीत म्हणजे एक साधना आहे. प्रत्येक सुरात एक कहाणी आहे. प्रत्येक तालामध्ये एक आत्मा आहे.
आपल्याकडे नादब्रह्म म्हणजे साऊंड ऑफ डिव्हाइनची संकल्पना आहे. आपले देवसुद्धा संगीताद्वारे व्यक्त होतात. त्यामुळेच मी म्हणतो की, यही समय हैं, सही समय हैं. आपण पद्म अवॉर्डला पीपल्स पद्म बनवले आहे. त्याचे स्वरूपच बदलून टाकले. भारताचे खाणे जगाला आवडत असून आता गाणेही आवडेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
भारत सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ही परिषद महाराष्ट्रात घेण्यासाठी प्रचंड मेहनत करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बाेलताना म्हणाले, करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. आजच्या डिजिटल युगात, आशय (कंटेंट) कोणत्याही वस्तूपेक्षा वेगाने प्रवास करतो. या सगळ्यात महाराष्ट्र या क्रांतीच्या अग्रस्थानी आहे. भारत आता सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. वेव्हज परिषद हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर ही एक चळवळ असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात ती साकार होत असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ५०० एकर क्षेत्रफळ असलेली मुंबईतील चित्रपट नगरी आता पुढील पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टमसाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित केली जात आहे. यातील १२० एकरमध्ये माध्यम व करमणूक शहर उभारण्यात येऊन यात ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंगवर लक्ष केंद्रित करणार आहे.
मुंबईत आयआयसीटीची स्थापना : अश्विनी वैष्णव
वेव्हजचे सर्वेसर्वा आणि ज्यांच्या पुढाकाराने हे सुंदर आयाेजन झाले ते रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव स्वागत करताना म्हणाले, भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था (आयआयसीटी) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संस्थेच्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हजच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगात जागतिक केंद्रस्थानी जाण्याच्या दिशेने जाेरदार वाटचाल करेल.
टपाल तिकिटाचे अनावरण
गुरुदत्त, पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक, सलील चौधरी यांच्या भारतीय सिनेमामधील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.