Join us
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: सर्वधर्मीय गुरूंना आवाहनाची मुख्यमंत्र्यांची सूचना स्वीकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 06:43 IST

पुढील नियोजनाचा भाग म्हणून मुंबई महापालिकेने आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आरोग्य कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच सुरु केले आहे.

मुंबई : सर्व धर्माच्या प्रमुख गुरू व धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही, तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल, असे आवाहन करणे खूप गरजेचे आहे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीने संवाद साधून तळागाळापर्यंत आवाहन करावे असे सांगितले.

लॉकडाउनच्या काळात नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असण्यासंदर्भात मुख्यमंत्री या कॉन्फरन्समध्ये बोलले होते त्यालाही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचले असून त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येत आहे. याशिवाय राज्यात घोषित लॉकडाउनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येईल असे ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले.

लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर नेमके कशा प्रकारे नेमके राज्य सरकारांनी कशी परिस्थिती ठेवावी या विषयीही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन मागितले. यावर पंतप्रधानांनी राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाउन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्प्याटप्प्याने याचे नियोजन करावे व कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे असे समजून लोक रस्त्यावर येतील असे न होऊ देण्याच्या सूचना केल्या.

अशी केली महाराष्ट्रात व्यवस्था

परराज्यातील श्रमिक, कामगार यांच्यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेता असून ३ हजार निवारा केंद्रांतून ३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, दोन वेळेसचे भोजन देत असल्याची माहिती यावेळी दिली. त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठीही यातील तज्ज्ञ, डॉक्टर नियुक्त केले आहेत असे सांगितले. परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना देखील आपण आहे तिथेच राहा, तुमची काळजी घेतली जाईल असे सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

पुढील नियोजनाचा भाग म्हणून मुंबई महापालिकेने आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आरोग्य कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच सुरु केले आहे. महापालिकेची ४ वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंगमधून एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आम्ही विशेष कक्षासाठी तयार करीत आहोत. नव्या मानकाप्रमाणे आम्ही लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींचेही रुग्णालयाबाहेर विलगीकरण करीत असून त्यासाठी पालिका अधिकारी आणि पोलिसांच्या देखरेखीखाली लॉज, क्लब, मंगल कार्यालये ताब्यात घेतली आहेत. पुढे गरज पडल्यास एखादी मोठी जागा निश्चित करून या ठिकाणी आयसोलेशन व क्वारंटाइन सुविधा उभारण्याचे नियोजन आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

आमचे पूर्ण लक्ष आम्ही कोरोनाचा प्रसार थांबविण्यावर केंद्रित केले असून पूर्वी चाचणी कमी होत असल्याने रुग्णांची संख्या कमी होती, खासगी प्रयोगशाळांनाही चाचणीची परवानगी दिल्याने आणि त्यांचे दोन तीन दिवसांचे निदान एकत्रितरीत्या हाती येत असल्याने रुग्णांची संख्या अचानक वाढल्याचे चित्र दिसते. मात्र या रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मुंबई महापालिका रुग्णालयात आयसोलेशनसाठी केवळ २८ रुग्णशय्या होत्या. त्यात आता २१०० पर्यंत वाढ करण्यात आली आहे.सध्या एकट्या सेव्हन हिल रुग्णालयात १५०० खाटांची सोय फक्त कोरोना रुग्णांसाठी करण्यात आली असून येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे येथेही कोविड रुग्णालय उभारत आहोत असेही ते म्हणाले.

वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन

पीपीई किट्स, एन ९५ मास्क, इतर वैद्यकीय उपकरणांची तर सध्या गरज आहेच. स्थानिक पातळीवर काही आवश्यक उपकरणे तयार करणाºया उद्योगांना प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांचे उत्पादन प्रमाणित करून मिळाल्यास आपण स्वत:ची क्षमता निर्माण करू शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस