CoronaVirus : चिंता वाढली! मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार ६८३ वर, बळींचा आकडा १६१
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 22:06 IST2020-04-22T22:06:05+5:302020-04-22T22:06:41+5:30
CoronaVirus : राज्यात १ लाख ९ हजार ७२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,०५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

CoronaVirus : चिंता वाढली! मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार ६८३ वर, बळींचा आकडा १६१
मुंबई : मुंबईतील कोरोनाची स्थिती दिवसागणिक भयावह होते आहे. मुंबईत बुधवारी ३०९ कोरोना रुग्णांचे निदान झाले त्यामुळे रुग्णसंख्या ३ हजार ६८३ झाली आहे. तसेच, १० मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा १६१ वर पोहोचला आहे. शहर उपनगरात वरळी, धारावी प्रमाणेच भायखळा, नागपाडा, आग्रीपाडा या परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याखेरीज, शहर उपनगरात ३ हजार १६९ अॅक्टीव्ह केसेसची नोंद झाली आहे.
राज्यात १ लाख ९ हजार ७२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,०५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९० हजार २२३ नमुन्यांपैकी ८३ हजार ९७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत.पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १७ ते १९ एप्रिलदरम्यान विविध प्रयोगशाळांमध्ये झालेल्या १२७ कोविड चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे, त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. तसेच, १४ ते १८ एप्रिलदरम्यान झालेल्या सात मृत्यूंची बुधवारी निश्चिती कऱण्यात आली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात सुरु संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी सुरु केलेल्या १५४ कोविड क्लिनिकमध्ये ५ हजार ८३६ लाभार्थींचे सर्वेक्षण कऱण्यात आले आहे. त्यापैकी २ हजार १९५ संशयितांचे नमुने घेण्यात आले आहे. मुंबईत पालिकेच्या विविध रुग्णालयांत बुधवारी ३०८ संशयितांना भरती कऱण्यात आले, तर आजपर्यंत एकूण ७ हजार ३२८ जणांना भरती केले आहे. तर बुधवारी १७ जण कोरोनामुक्त झाले शहर उपनगरात आजपर्यंत ४२५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
भाटिया रुग्णालयाच्या आणखी १० कर्मचाऱ्यांना कोरोना
मुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो आहे. ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाच्या आणखी १० कर्मचाऱ्यांना बुधवारी कोरोना झाल्याचे आढळले. त्यामुळे रुग्णालयातील एकूण रुग्ण संख्या ४५ वर पोहोचली आहे. यातील आठ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
बळींचा आकडा वाढतोय
राज्यातील १९ मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. राज्यात बळींचा आकडा २६९ वर पोहोचला आहे. १९ मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ६३ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.