Join us  

coronavirus : दिवे पेटवण्याच्या आवाहनापेक्षा मोदींनी देशाला आशेचा किरण दाखवायला हवा होता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 12:05 PM

देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशातील सद्यस्थितीबाबत सत्य परिस्थिती मांडणे आवश्यक होते

मुंबई - राज्यात आणि देशात कोरोना विषाणूच्या होत असलेल्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी तबलिगी जमातींच्या काही लोकांकडून होत असलेल्या विकृत चाळ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यात यावी अशी मागणी केली. तसेच रविवारी रात्री दिवे पेटवण्याचे आवाहन करणाऱ्या पंतप्रधान मोदींनाही राज ठाकरे यांनी टोला लगावला. दिवे पेटवण्याच्या आवाहनापेक्षा मोदींनी देशाला आशेचा किरण दाखवायला हवा होता, असे राज ठाकरे म्हणाले.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की, देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशातील सद्यस्थितीबाबत सत्य परिस्थिती मांडणे आवश्यक होते.  आता त्यांनी दिवे लावण्याचे केलेले आवाहन हा श्रद्धा अंधश्रद्धेचा विषय आहे. पण दिवे पेटविण्याच्या आवाहनापेक्षा मोदींनी देशाला आशेचा किरण दाखवला असता तर जनतेला अधिक समाधान वाटले असते. तसेच गेल्या दोन तीन दिवसांपासून तबलिगीसारख्यांकडून होत असलेल्या गैरकृत्यांविरोधातही पंतप्रधानांनी बोलणे अपेक्षित होते.

कोरोना व्हायरसची वाढणारी संख्या देशासाठी अन् विशेषत: राज्यासाठी चिंतेचा विषय बनली असताना काही घृणास्पद प्रकार समोर येत आहेत. मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा काही कारस्थान वाटत असेल तर यांना जगवायचं कशाला? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.

 समाजाची सर्वात मोठी जबाबदारी आहे, नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञही असायला हवं. जर लोक असेच वागणार असतील तर लॉकडाऊन वाढेलच, डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी यांना पेशंट शोधायलाच वेळ जाईल, घरी लोक लपून बसलेत, लक्षणे आढळलेल्यांनी स्वत: पुढे आले पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं.

त्याचसोबत भाज्यांवर थुंकणारे, नर्ससमोर नग्न होणारे यासारख्यांना फोडून काढलं पाहिजे, त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले पाहिजेत. नुसता केसेस टाकून उपयोग नाही. कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करण्याऱ्यांना गोळ्या घाला. लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, आक्षेपार्ह वागणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे असा इशारा राज यांनी दिला.

दरम्यान, लोकांमधील संभ्रम सरकराने दूर करावा. सर्व डॉक्टर स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत आहेत, पोलीस, शेतकरी, पाणीपुरवठा कर्मचारी आणि सरकार काम करत आहे, मात्र लोकांना गांभीर्य कळत नाहीय. लोकांना भीती आहे नोकरी राहील का, भाजीपाला मिळेल का, रेशन मिळेल का वगैरे, पण काहीजण शिस्त पाळत नाहीत, त्यामुळे ही वेळ आलीय. लॉकडाऊन गांभीर्याने, रेशन, भाजीचे प्रश्न आहेत, ते अनेक ठिकाणी उपलब्ध आहे, सरकार उपलब्ध करतंय, हे गांभीर्याने घेतलं नाही आणि दिवस वाढवले तर त्याचे परिणाम उद्योगधंद्यासह सर्वांवर होईल अशीही भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली.

टॅग्स :राज ठाकरेनरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस