Join us  

Coronavirus: राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्ती?; राजेश टोपेंनी दिले संकेत, आजच निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 4:05 PM

आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते.

मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत असून, या पार्श्वभूमीवर राज्यात बंदिस्त ठिकाणी (इनडोअर) मास्क वापराची सक्ती करण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. तशी शिफारस राज्य टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढविण्याच्या गरजेवर भर दिला असल्याची माहिती समोर आली आहे. 

दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून, त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी टास्क फोर्सची सोमवारी रात्री बैठक घेतली. तेव्हा ही चिंता त्यांच्या कानावर घालण्यात आली.  मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक आहे, असे टास्क फोर्सने सांगितले.  

आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. गर्दीच्या ठिकाणी राज्यात मास्क सक्ती करण्याचा विचार असून, आज मुख्यमंत्र्याच्या बैठकीत त्यावर निर्णय होणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी बैठकीनंतर दिली. 

राजेश टोपे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. आपलं राज्य सेफ झोनमध्ये आहे. आज ९२९ ॲक्टिव्ह केसेस आहेत. तसेच लसीकरण करण्यात आपण खूप पुढे आहोत. ६ ते १२ वयोगटासाठी नव्याने लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियमावली आली की, लगेचच लसीकरण सुरु होईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. 

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती करण्याबाबतची शिफारस टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ.संजय ओक, डॉ.शशांक जोशी, तसेच इतर सदस्य बैठकीला उपस्थित होते. सध्या संसर्ग झालेली व्यक्ती ही रॅपिड टेस्ट करून स्वत:वर घरच्या घरीच उपचार करून घेत आहे. त्यांना विलगीकरणातील आवश्यक उपचार घेणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही, असे निरीक्षणही टास्क फोर्सच्या सदस्यांनी नोंदविले आहे.

टास्क फोर्सच्या सूचना-

किमान बंदिस्त ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक करावे. विशेषत: चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स अशा ठिकाणी संसर्गाचा धोका लक्षात घेता, या ठिकाणी मास्क बंधनकारक पाहिजेत. विमान कंपन्या प्रवाशांना मास्क वापराविषयी वारंवार सांगतात, तशाच पद्धतीने रुग्णालयांमध्येही मास्कचा वापर प्राधान्याने सुरू करण्याविषयी सूचना देणे आवश्यक आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. दुसऱ्या डोसनंतर बूस्टर डोस घेण्यासाठी २७० दिवसांचे अंतर कमी करून १८० दिवसांवर आणावे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारराजेश टोपेमहाराष्ट्र