CoronaVirus Lockdown : मुंबईबाहेर जाणाऱ्या मजुरांची गर्दी वाढली; अफवांवर विश्वास ठेवू नका - रेल्वे प्रशासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 07:09 IST2021-04-11T01:02:40+5:302021-04-11T07:09:54+5:30

CoronaVirus Lockdown: मुंबईतून गावी परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने भरून जाताना दिसत आहेत.

CoronaVirus Lockdown: Crowd of laborers leaving Mumbai | CoronaVirus Lockdown : मुंबईबाहेर जाणाऱ्या मजुरांची गर्दी वाढली; अफवांवर विश्वास ठेवू नका - रेल्वे प्रशासन

CoronaVirus Lockdown : मुंबईबाहेर जाणाऱ्या मजुरांची गर्दी वाढली; अफवांवर विश्वास ठेवू नका - रेल्वे प्रशासन

मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. मुंबईतील वाढत्या कोरोनामुळे वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या गावची वाट धरली आहे. मुंबईतून गावी परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने भरून जाताना दिसत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेकडून अतिरिक्त गाड्या चालविण्यात येत आहेत. दरम्यान, आसन आरक्षित केलेल्या प्रवाशांनाच रेल्वेतून प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे.

या गाड्यांमध्ये पुणे-भागलपूर विशेष १० एप्रिल रोजी पुणे येथून २१.१५ वाजता सुटली व भागलपूर येथे तिसऱ्या दिवशी ११.३० वाजता पोहोचेल. भागलपूर येथून विशेषगाडी १२ एप्रिल रोजी भागलपूर येथून २२.३० वाजता सुटेल व पुणे येथे तिसऱ्या दिवशी १२.०५ वाजता पोहोचेल. मुंबई - गोरखपूर विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ११ एप्रिल रोजी ०६.३५ वाजता सुटेल आणि गोरखपूरला दुसऱ्या दिवशी १८.४० वाजता पोहोचेल. गोरखपूर येथून विशेषगाडी १३ एप्रिल रोजी सकाळी ०८.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २२.३० वाजता पोहोचेल. पुणे-गोरखपूर विशेषगाडी ११ एप्रिल रोजी पुणे येथून २२ वाजता सुटेल, गोरखपूरला तिसऱ्या दिवशी ६.३५ वाजता पोहोचेल. गोरखपूर येथून १३ एप्रिल रोजी २१.१५ वाजता सुटेल व पुणे येथे तिसऱ्या दिवशी ०६.२५ वाजता पोहोचेल.

सोलापूर आणि गुवाहाटी दरम्यान विशेष अतिरिक्त गाड्या १२ ते २६ एप्रिल (३ फेऱ्या) पर्यंत सोलापूर येथून दर सोमवारी १७.३० वाजता सुटेल  व गुवाहाटीत चौथ्या दिवशी ००.३० ला पोहोचेल. गुवाहाटी येथून विशेष गाड्या १६ ते ३० एप्रिल (३ फेऱ्या) पर्यंत गुवाहाटी येथून दर शुक्रवारी ०५.३० वाजता सुटेल व सोलापूरला तिसऱ्या दिवशी ०७.५५ वाजता पोहोचेल.

अफवांवर विश्वास ठेवू नका
श्रमिक विशेष गाड्या चालविल्या जात असल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावरून पसरविली जात आहे. अशा कोणत्याही श्रमिक विशेष गाड्या चालविल्या जात नाहीत किंवा तसे नियोजन नाही. रेल्वे फक्त उन्हाळी विशेष गाड्या आणि नियमित विशेष गाड्या चालवीत आहे. लोकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले.
 

Web Title: CoronaVirus Lockdown: Crowd of laborers leaving Mumbai