Join us  

Coronavirus: ‘प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपानं असंवेदनशीलतेचा कळस गाठला’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 8:02 AM

भाजपच्या आमदार, खासदार, नगरसेवकांचा मदतनिधी पक्षाच्या आपदा निधीत कशासाठी?

ठळक मुद्देमदतीच्या बहाण्याने राजकीय प्रचार करण्याचा हा किळसवाणा प्रकार आहे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोरोना संकटाचा मुकाबला अत्यंत उत्तमरित्या करतंयभाजपाला कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचेच प्रतिक आहे

मुंबई - सर्व जग सध्या कोरोना विषाणूच्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. भारतातही कोरोनाने थैमान मांडले असून अशा संकटावेळी राजकारण बाजूला सारून सर्वांनी एकजूट होऊन या संकटाचा सामना करण्याची गरज आहे, मात्र भाजपा व त्यांच्या नेत्यांची भूमिका दुर्दैवाने असंवेदनशील आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यावेळी सचिन सावंत म्हणाले की, प्रत्येक घटनेचा इव्हेंट करण्याची सवय लागलेल्या भाजपाने कोरोनाच्या गंभीर संकटातही असंवेदनशीलता कळस गाठला आहे. गरीब, कामगार, कष्टकरी तसेच हातावर पोट असलेले लोक या संकटात होरपळले जात असताना त्यांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे. हजारो हात मदताठी पुढे आले आहेत परंतु भाजपा अनेक राज्यात मोदींच्या नावाने मदत देण्याचे काम करत आहे. गरीब लोकांना गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यासाठी ‘मोदीकीट’ बनवून त्यावर मोदींचा फोटो लावला जात आहे. राष्ट्रीय संकटाच्या मदतकार्यातही असे व्यक्तीस्तोम माजवण्याचा व राजकीय प्रचार करण्याचा हा किळसवाणा प्रकार आहे असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच कोरोनाच्या या संकटात सर्वसामान्य लोक, उद्योगपती, खेळाडू, चित्रपट कलाकारांसह अनेकजण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मात्र भाजपाच्या सर्व आमदार, खासदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत व जिल्हा परिषद सदस्यांनी एक महिन्याचे वेतन भाजपाच्या आपदा मदत निधीला देण्याचे आवाहन केले आहे. जनतेच्याच पैशातून मिळालेले हे वेतन सरकारच्या मदतनिधीत जमा न करता पक्षाच्या मदतनिधीत जमा करण्याचा प्रकार हा महाराष्ट्रद्रोहीच म्हणावा लागेल असा घणाघात काँग्रेसने केला.

त्याचसोबत भाजपाचे काही नेते तर कोरोनावर मात करण्यासाठी अनेक अशास्त्रीय उपाय सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. गाईचे शेण व गोमुत्राने कोरोना बरा होऊ शकतो असे तारेही त्यांनी तोडले आहेत. या सर्वांवर महाराष्ट्र भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी कळसच गाठला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री जयंत पाटील यांनी कोरोना संकटावेळी पंतप्रधान मोदी यांनी ज्यापद्धतीने देश लॉकडाऊन केला त्यावर काही प्रश्न उपस्थित केले होते. पाटील यांनी मोदींवर टीका केली म्हणूनच इस्लापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्याची शिक्षा झाली असे असंबंध व बेताल वक्तव्य वाघ यांनी केल्याचं सावंत यांनी बोलून दाखवलं.  

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोरोना संकटाचा मुकाबला अत्यंत उत्तमरितीने करत असताना उगाचच विरोधास विरोध म्हणून राज्य सरकारवर टीका करणे, मदतीमध्ये स्वतःचे अस्तित्व दाखवून श्रेय लाटणे असे उद्योग करणे म्हणजे भाजपाला या परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचेच प्रतिक आहे असा टोलाही काँग्रेसनं भाजपाला लगावला.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकाँग्रेसभाजपाउद्धव ठाकरे