Join us  

कोरोनाच्या संकटादरम्यान जनतेत असंतोष निर्माण करण्याचा भाजपाचा हीन प्रयत्न, काँग्रेसचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 4:17 PM

केंद्र सरकारने येत्या तीन महिन्यासाठी २० लाख मेट्रीक टन धान्य दिलेले आहे असे अतिरंजीत चित्र फडणवीस यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देभाजपाने संकटकाळी गलिच्छ राजकारण बंद करुन सहकार्याची भूमिका घ्यावीआधारकार्डवर रेशन देण्याचा आग्रह धरणाऱ्या फडणवीसांना महाराष्ट्रात पूर आला तेव्हा हे का आठवले नाही?कोरोनाच्या संकटादरम्यान जनतेत असंतोष निर्माण करण्याचा भाजपाचा हीन प्रयत्न

मुंबई - देशपातळीवर कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाला एकत्र येऊन सामना करावा हा पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला राज्यातील भाजपाचे नेते हरताळ फासत असून, राज्य सरकारला मदत करण्याऐवजी जनतेत असंतोष निर्माण होईल अशा तऱ्हेचा प्रयत्न करत आहेत. आधारकार्डवर रेशन द्या हा आग्रह धरणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यापद्धतीची आठवण महाराष्ट्र पूरस्थितीचा सामना करत असताना का झाली नाही?  फडणवीसांना लाभार्थ्यांच्या यादीत स्वतःचे नाव घालायचे आहे का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत म्हणाले की, ''राज्यातील सर्व गरजुंचे पोट भरले पाहिजे या भूमिकेत महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे. तसेच शिवभोजन थाळीची नवीन २८५ केंद्र तयार करुन राज्यातील तालुकास्तरापर्यंत या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे त्याचा लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. या संख्येत कितीही वाढ झाली तरी ती पूर्ण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे.  असे असतानाही आधारकार्डावर राशन देण्यात यावे ही मागणी करताना देवेंद्र फडणवीस सारख्या सधन व्यक्तींना गरज नसताना राशन द्यावे लागेल व जे खऱेच गरजू आहेत त्यांच्यापर्यंत धान्य पोहचणार नाही हे पाच वर्षे सत्तेत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही असे नाही. आधारकार्डवर राशन द्यायचे म्हटले तर अदानी, अंबानीही लाभार्थी होतील, हाच भाजपाचा उद्देश आहे का? हीच आठवण सत्तेत असताना राज्यात महापूर व इतर आपत्ती आली त्यावेळी त्यांना का झाली नाही? केंद्र सरकारने येत्या तीन महिन्यासाठी २० लाख मेट्रीक टन धान्य दिलेले आहे असे अतिरंजीत चित्र फडणवीस यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रावसाहेब दानवे यांचा दाखला ते देतात. उंदराला मांजर साक्ष हा तो प्रकार आहे.केंद्र सरकारने २६ मार्चला ५ किलो अतिरिक्त धान्य प्रती व्यक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्याचे पत्र केंद्रातर्फे फूड कार्पोरेशनला ३० मार्चला आले आहे. अजूनही एफसीआयकडून सदर धान्य राज्य सरकारला प्राप्त झालेले नाही. असे असतानाही राज्य सरकारने आपल्या स्वतःच्या धान्य साठ्यातून या अतिरिक्त धान्य वाटपास सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर कोणत्याही रंगाचे रेशन कार्ड असेल तरीही त्यांना कोणत्याही अटींशिवाय हे धान्य उपलब्ध होणार आहे असे धादांत खोटे विधानही फडणवीस यांनी केले आहे.

केंद्र सरकारने आपल्या आदेशात सरळ सरळ नमूद केले आहे की अन्न सुरक्षा कायद्याच्या आधारावर जेवढे लाभार्थी उल्लेखित केलेले आहेत त्यांनाच हा धान्य पुरवठा करावा. केंद्र सरकारच्या आदेशातच या अटीचा उल्लेख असल्यामुळें सर्व रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य दिले जाईल असे ते खोटं सांगत आहेत. त्यातही केंद्र सरकारनेच ठरवून दिलेल्या नियमानुसार या अतिरिक्त धान्याचे वितरण करण्यात येत असताना धादांत खोटे बोलून जनतेमध्ये असंतोष निर्माण करणे हा भाजपाचा उद्देश आहे, असे सावंत म्हणाले.

महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार असताना जे अन्न सुरक्षा कायद्यामध्ये लाभार्थी म्हणून पात्र होत नाहीत परंतु ज्यांना गरज आहे अशांना म्हणजेच केशरी कार्डधारकांना राज्य सरकारतर्फे निधीची उपलब्धता करुन माफत दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीस सरकार आल्यानंतर सदर निर्णय रद्द करुन २०१८ साली केवळ काही जिल्ह्यांकरताच या अतिरिक्त गरजूंना धान्य देणे सुरु केले. परंतु राज्यातील बहुसंख्य भागांना सदर निर्णय लागू नव्हता म्हणून फडणवीस यांना अशा तऱ्हेचे वक्तव्य करण्याचा नैतिक अधिकार नाही. याउप्पर राज्य सरकारने केशरी कार्डधारकांना धान्य दिले जाईल हा निर्णय घेतला आहे तो जनतेच्या काळजीपोटी! फडणवीस यांनी त्यांच्या सत्ताकाळात जनतेला वाऱ्यावर सोडले होते.

राज्यामध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत वाहतुकदार तयार होत नसतानाही जनतेला राशन मिळेल करिता शासन प्रयत्नांची परकाष्ठा करत आहे. अनेक वाहनांना ड्रायव्हरही मिळत नाहीत तरिदेखील पहिल्या पाच दिवसांत राज्य सरकारने जवळपास २ कोटी २४ लाख लाभार्थीं म्हणजे ३३ टक्के रेशनकार्ड धारकांना धान्य पुरवले आहे आणि लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. अशा कठीण परिस्थीतीत राज्य सरकार काम करत असताना विरोधी पक्षाने सहकार्याची भुमिका घेण्याची गरज आहे परंतु भाजप नेते अशावेळीही गलिच्छ राजकारण करण्याचे सोडत नाहीत हे दुर्दैवी आहे, असे सावंत म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसराजकारणभाजपाकाँग्रेससचिन सावंत