राज्यातील सात जिल्ह्यांत वाढतोय कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 02:50 IST2020-08-20T02:49:56+5:302020-08-20T02:50:23+5:30

मुंबईत नियंत्रित झालेला कोरोनाचा संसर्ग आता अन्य जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे.

Corona infection is on the rise in seven districts of the state | राज्यातील सात जिल्ह्यांत वाढतोय कोरोनाचा संसर्ग

राज्यातील सात जिल्ह्यांत वाढतोय कोरोनाचा संसर्ग

मुंबई : देशातील १० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीत समोर आले आहे. यात राज्यातील सात जिल्ह्यांचा समावेश असून, या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण दिवसागणिक वाढते आहे. मुंबईत नियंत्रित झालेला कोरोनाचा संसर्ग आता अन्य जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या अभ्यासानुसार, संपूर्ण देशभरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण ७.७ टक्के असून, राज्यात हे प्रमाण १८ टक्के आहे. राज्यातील रायगड जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३१.७ टक्के असून, आतापर्यंत येथे ७४ हजार ५७७ कोविड चाचण्या झाल्या आहेत. तर ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या ३ लाख ९० हजार ३७८ चाचण्या झाल्या असून, येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण २९.४ टक्के आहे.
राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण १९.९ टक्के असून, या ठिकाणी आदिवासी क्षेत्र जास्त आहे. तर नाशिकमध्ये २६.७ टक्के, धुळे २५.७, पुणे २३.४, जळगाव २२ आणि साताऱ्यात हे प्रमाण २१ टक्के इतके आहे. डॉ. सुभाष साळुंखे यांनी याविषयी सांगितले, जिल्ह्यांमध्ये वाढत असलेल्या संसर्गाचे मुख्य कारण हे जिल्हाअंतर्गत सुरू केलेली वाहतूक हे आहे. मुख्य हायवे प्रवासाकरिता खुले केल्याने नागरिकांची वर्दळ वाढल्याने संसर्गाचा धोका वाढत आहे.

Web Title: Corona infection is on the rise in seven districts of the state