Join us  

काँग्रेसची अवस्था डोकं नसलेल्या धडासारखी, आंबेडकरांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 6:43 PM

लोकसभेच्या फेरमतदानासाठी निवडणूक याचिका दाखल

ठळक मुद्देलोकसभेच्या फेरमतदानासाठी निवडणूक याचिका दाखल पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले की, गेल्या तीन निवडणुकांपासून राज्यातील निम्म्या मतदारसंघात काँग्रेस लढलीच नाहीये

मुंबई : राज्यातील काँग्रेसची स्थिती पाहूनच आम्ही त्यांना ४० जागांचा प्रस्ताव दिला आहे. आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे, पुढे काय करायचे ते कॉंग्रेसने ठरवाव. सध्या केंद्रात आणि राज्यातही त्यांच्याकडे निर्णय घेणारेच कोणी नाही. त्यामुळे धड आहे आणि डोकं नाही, अशी काँग्रेसची अवस्था झाल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केली.

पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले की, गेल्या तीन निवडणुकांपासून राज्यातील निम्म्या मतदारसंघात काँग्रेस लढलीच नाहीये. त्यामुळे तिथे त्यांचे संघटनच नाही. आमच्या प्रस्तावाचे काय करायचे, याचा निर्णय काँग्रेसने घ्यायचा आहे. आमच्या संसदीय समितीने दौरे सुरू केले आहेत. दहा जिल्ह्यात मुलाखतीही झाल्या आहेत. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार दिले होते. त्याप्रमाणे सर्व विधानसभा मतदारसंघ लढण्याची आमची तयारी आहे. राष्ट्रवादीबाबत विचारले असता आंबेडकर म्हणाले की, आपली मते राष्ट्रवादीला मिळतात. पण त्यांची मते आपल्याला मिळत नाही, अशी काँग्रेस नेत्यांचीच तक्रार असते. त्यामुळे राष्ट्रवादीपासून दोन हात लांब राहिलेलेच बरे, असे आंबेडकर म्हणाले. इतकी वर्षे सत्तेविनाच आहे. त्यामुळे मी सत्तेचा भूकेला नाही, हे कळायला हवे, असे सांगत वंचित आघाडीला भाजपची बी टीम म्हणणाऱ्यांना आंबेडकरांनी फटकारले.

एमआयएमने राज्यात शंभर जागांची मागणी केली आहे यावर, ओवेसी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मतदारसंघांच्या संख्येवर चर्चा झाली नाही. निवडणून येणे या निकषावर चर्चा झाली. जिथे जिंकण्याची शक्यता आहे त्या जागांचा आग्रह धरण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे एमआयएमसोबतच्या जागावाटपात संख्या हा निकष नसेल असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

फेरमतदानासाठी निवडणूक याचिकाझालेले मतदान आणि ईव्हीएममधील मतांची संख्या यात विसंगती आढळून आली आहे. अशी विसंगती आढळून आल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसारच निकाल द्यावा असा नियम आहे. राज्यात कोणत्याच निवडणूक अधिकाºयाने या विसंगतीनंतर आयोगाकडे विचारणा केली नाही. त्यामुळे आयोगाच्याच नियमांचा भंग झाला आहे. याविरोधात लोकसभा मतदारसंघातील आकडेवारीच्या आधारे ३१ निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने मतदानातील तफावतीबाबत निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे खुलासा मागावा. तसेच असे निकाल रद्दबातल करून फेरनिवडणूक घेण्याची मागणी केल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीपुर्वी या निवडणूक याचिकेची सुनावणी घेत आगामी निवडणुका बॅलेट पेपरने घेण्याच्या मागणीचाही त्यांनी पुनरूच्चार केला.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडीमुंबईकाँग्रेस