Join us  

“महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण काँग्रेस खपवून घेणार नाही, अमोल कोल्हेंनी...”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 5:20 PM

अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका करून गांधी हत्येचे एकप्रकारे समर्थनच केले आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

मुंबई: ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांची भूमिका करणारे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) नव्या वादात सापडले आहेत. यातच आता राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या हत्येचे समर्थन आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेंचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न एका विशिष्ठ वर्गाकडून सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका करून पुन्हा एकदा गोडसेचा उदोउदो करण्याचा प्रयत्न केला असून काँग्रेस पक्ष महात्मा गांधींच्या मारकऱ्याचे उदात्तिकरण कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.

डॉ. अमोल कोल्हे कलाकार असले, तरी ते एका पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी अधिक जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आहे. कलाकार म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याच्या दुरुपयोग करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन आणि नथुरामचे उदात्तीकरण करणे हे दुर्दैवी आहे. नथुराम गोडसेला नायक बनवण्याचा हा प्रयत्न चुकीचा पायंडा पाडणारा आहे. याआधीही काही कलाकारांनी गोडसेच्या भूमिका केल्या त्यावरही लोकांनी तीव्र नापसंती व संताप व्यक्त केला होता. डॉ. कोल्हे नथुरामची भूमिका करण्याबद्दल देत असलेले स्पष्टीकरण अत्यंत तकलादू व न पटणारे आहे, असे नाना पटोले म्हणाले.

RSS आणि भाजपचे नथुरामबद्दलचे विचार सर्वांना माहितीयेत

नथुरामच्या भूमिकेबद्दल भारतीय जनता पक्षाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया काही नवीन नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व नथुराम गोडसेबद्दलचे विचार सर्वांना माहित आहेत. परंतु डॉ. कोल्हे यांनी नथुरामची भूमिका करून गांधी हत्येचे एकप्रकारे समर्थनच केले आहे. डॉ. कोल्हे आता कितीही सारवासारव करत असले तरी त्याला काहीही अर्थ नाही. देशातील एका विशिष्ट विचारसरणाचे लोक सातत्याने नथुरामला जिवंत करुन महात्मा गांधींचा अपमान करत असतात परंतु ७५ वर्षानंतरही महात्मा गांधींच्या विचाराचे महत्व कमी झालेले नाही उलट जगातील विविध देश महात्मा गांधींच्या विचाराचा वारसा घेऊन वाटचाल करत आहेत ही त्यांच्या विचाराची ताकद आहे. आपल्याच देशातील काही लोक मात्र महात्मा गांधींचे विचार पुसण्याचे काम करत आहेत परंतु गांधी विचार व त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान जनता विसरलेली नाही व विसरणारही नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :नथुराम गोडसेनाना पटोलेडॉ अमोल कोल्हे