Congress Harshwardhan Sapkal News: देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिरा गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिरा गांधी, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी प्रशासनाकडून काही चूका झाल्याचे मान्य केले आहे. पण, भाजपा मात्र आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे. रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी आरएसएसचा संबंध नाही, असेही जाहीर केले होते. भाजपाला बाळासाहेब देवरसांची भूमिका मान्य नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ साली आणीबाणी लागू करण्याचा जो निर्णय घेतला होता, तो संविधानिक होता. देशात काही शक्ती अराजक निर्माण करू पाहात होत्या. नंतर आणीबाणी उठवून निवडणुका घेतल्या आणि लोकशाही प्रक्रिया पार पाडली. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीवेळी देशाची संपत्ती विकली नाही, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपतींच्या घशात घातल्या नाहीत. पण देशात मागील ११ वर्षांपासून अघोषित आणीबाणी सुरू आहे, विमानतळ, बंदरे, खाणी, बँका, सरकारी जमिनी लाडक्या उद्योगपतीला विकल्या जात आहेत. धारावीची जमीन विकली आहे. देशात आज हुकूमशाही असून भाजपाचा भस्मासूर लोकशाही गिळू पहात आहे, या शब्दांत सपकाळ यांनी हल्लाबोल केला.
काँग्रेसकडून आणीबाणी विशेष अंक
काँग्रेस पक्षाचे मुखपत्र जनमानसाची शिदोरी या मासिकाचा आणीबाणी विशेष अंक काढला आहे. या अंकात इंदिराजी गांधी, पुपुल जयकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दैनिक सामनाचे संपादक व खा. संजय राऊत यांच्यासह अनेक ज्येष्ठ लेखकांनी लेख लिहिले आहेत. या अंकातून आणीबाणी संदर्भातील सत्य लोकांसमोर आणले जाणार असून भाजपच्या खोट्या प्रचाराला चोख उत्तर मिळेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणीबाणी संदर्भात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत जाहिरातबाजी केली आहे. सरकारी जाहिरातीतून राजमुद्रा गायब असून सेंगोल दाखवला आहे. सेंगोल कशाचे प्रतिक आहे, हे वेगळे सांगायला नको. भाजपाला लोकशाही व संविधान संपवून गोलवलकर यांचे 'बंच ऑफ थॉट' लागू करायचे आहे, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.