Join us  

Maharashtra Political Crisis: हे तर ‘ईडी’चे सरकार, म्हणणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावले; म्हणाले, “आम्ही कुठे वेगळे...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 3:38 PM

Maharashtra Political Crisis: सामान्यपणे कोणी सत्ता सोडत नाही. पण आम्ही सत्तेतून बाहेर गेलो याचे कारण काय आहे? याचे आत्मपरिक्षण करावे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. शिवसेनेतील संघर्ष काही प्रमाणात तीव्र होताना पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. 

राज्यात नवे सरकार आल्यावर तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री म्हणून भाजपला पाठिंबा द्यावा लागला ते पाहता २०१९ मध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे या अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतील प्रस्तावाची अंमलबजावणी झाली असती तर आज ही वेळ आली नसती. मग मला कशाला मुख्यमंत्री केले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. 

आम्ही कुठे वेगळा रस्ता निवडलाय? 

एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत बोलताना, आम्ही कुठे वेगळा रस्ता निवडलाय? आम्ही तोच मार्ग निवडलाय. शिवसेना आणि भाजपाची युती होती. आम्ही एकत्र निवडणूक लढलो. आमच्याकडे सध्या शिवसेनेतील दोन तृतीयांशपेक्षा जास्त सहकारी आहेत. आम्ही भाजपासोबत आहोत. आम्ही एक मजबूत सरकार देत आहोत. आम्ही कोणतेही चुकीचे पाऊल उचलेले नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 

हे तर ‘ईडी’चे सरकार, म्हणणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावले

हे तर ईडीचे सरकार म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे, टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, यावर काही बोलू इच्छित नाही. आमचे ते ५० आमदार वेगळी भूमिका स्वीकारतात. ते सत्तेतून बाहेर जातात. सामान्यपणे कोणी सत्ता सोडू पाहत नाही. पण आम्ही सत्तेतून बाहेर गेलो याचे कारण काय आहे? याचे सर्वांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

दरम्यान, त्यावेळी ऐकले असते तर हे सारे सन्मानाने झाले असते. लोकसभा-विधानसभेसाठी युती होत असताना हेच ठरले होते. भाजपने आमचे ऐकले असते, तर महाविकास आघाडी स्थापनही झाली नसती आणि अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री राहिला असता. आता तर पाचही वर्षे भाजपचा मुख्यमंत्री नाही, असे सध्याचे चित्र आहे. आमचे ऐकले असते तर अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री राहिला असता. या साऱ्यात भाजपला काय आनंद मिळाला समजत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळएकनाथ शिंदेउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस