दर्जेदार आरोग्य व शिक्षण मिळणे नागरिकांचा हक्क; हक्क अधिवेशनात ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:52 IST2020-02-06T01:51:53+5:302020-02-06T01:52:30+5:30

हक्क अधिवेशनात ठराव

Citizens' right to a good health and education; Rights Convention Resolution | दर्जेदार आरोग्य व शिक्षण मिळणे नागरिकांचा हक्क; हक्क अधिवेशनात ठराव

दर्जेदार आरोग्य व शिक्षण मिळणे नागरिकांचा हक्क; हक्क अधिवेशनात ठराव

मुंबई : महाराष्ट्रात दोन कोटीहून अधिक लोक कुपोषित आहेत. ३० टक्के लोकांहून अधिक जण दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत.  राज्य व केंद्र सरकारने त्यांना दर्जेदार शिक्षणआरोग्य मिळवून देणे आवश्यक आहे, असा ठराव रविवारी सार्वजनिक हक्क अधिवेशनामध्ये एकमताने मंजूर करण्यात आला.

‘मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर (एमपीजे)’च्या वतीने हज हाऊस येथे ही परिषद आयोजिण्यात आली होती. त्यामध्ये देशभरातील विविध संघटना, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद सैदुल्लाह हुसेनी होते. तर अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक प्रमुख उपस्थित होते.

दिवसभरात दोन सत्रात झालेल्या अधिवेशनामध्ये देशात सध्या एनआरसी, सीएए नव्हे, तर नागरिकांना उपासमारीपासून वाचविण्याची गरज आहे, असे मत अनेक तज्ज्ञ व वक्त्यांनी मांडले. ‘एमपीजे’चे प्रदेशाध्यक्ष मुहम्मद सिराज म्हणाले, ‘भारत हा जगातील ४५ देशांपैकी एक आहे, जेथे उपासमारीची समस्या गंभीर आहे. राज्यातील दारिद्र्य दर १८ टक्के आहे.

प्रा. सय्यद मोहसीन म्हणाले की, सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचे उत्पादन एक मोठी समस्या बनली आहे. आमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. या सर्वेक्षण अहवालानुसार पाचव्या वर्गातील सुमारे ७० टक्के मुलांना अंकगणित गणना करता येत नाही. ४० टक्के विद्यार्थी शब्द ओळखून उच्चारू शकत नाहीत. कुमकुवत मुले नववीत नापास होतात आणि ही शाळा सोडणारी मुले एक तर असामाजिक कार्यात गुंततात किंवा असंघटित क्षेत्रात दिसतात.

राज्यातील आरोग्याच्या सद्यस्थितीबद्दल डॉ. अभिजीत यांनी सरकारच्या उदासीनतेमुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्याची पायाभूत सुविधा आजारी पडल्याचे आकडेवारीनिशी नमूद केले. केवळ २० लोक राज्यातील सरकारी रुग्णालयात जातात, उर्वरित लोक महागड्या खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी भाग पडतात.

कामगार चळवळीचे कार्यकर्ते मधुकांत पठारिया यांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांचे कल्याण व हक्क यावर मार्गदर्शन केले. या अधिवेशनात लोकांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल जनसुनावणी घेण्यात आली. त्याचा निकाल उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील गायत्री सिंह आणि टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेसचे प्रा. महेश कांबळे यांनी केला.
या सत्राचे मुख्य वक्ते व माजी आयएएस अधिकारी हर्ष मंदार यांनी देशातील सार्वजनिक हक्कांच्या वितरणाबद्दल चिंता व्यक्त केली आणि लोकहक्कांच्या प्राप्तीबद्दल मार्गदर्शन केले.

Web Title: Citizens' right to a good health and education; Rights Convention Resolution