Mumbai Local: पश्चिम रेल्वेला जे जमले, ते मध्य रेल्वेला का नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:07 IST2025-05-29T13:07:14+5:302025-05-29T13:07:21+5:30
Heavy Rain Hits Mumbai Local Train: पम्पिंग स्टेशन सुरू करण्यास वेळच मिळाला नाही

Mumbai Local: पश्चिम रेल्वेला जे जमले, ते मध्य रेल्वेला का नाही?
मुंबई : शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रुळांवर सुमारे आठ इंचापेक्षा जास्त पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मात्र, पश्चिम रेल्वेच्या कोणत्याही स्टेशनमधील रूळ पाण्याखाली गेले नाहीत. जे पश्चिम रेल्वेला जमले, ते मध्य रेल्वेला का नाही जमले, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर केलेली नालेसफाई, विविध उपाययोजनांमुळे पश्चिम रेल्वे पावसाच्या पहिल्या परीक्षेत ‘पास’ झाली असून, मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा खोळंबा टळला. मात्र, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दोन दिवस त्रासाला सामोरे जावे लागले. रुळांवर पाणी साचल्याने हार्बर रेल्वेवरील सेवा काही काळासाठी बंद होती.
मायक्रो टनेलिंग, ड्रेनेजची व्यापक दुरुस्ती
रुळांवर पाणी सचू नये, यासाठी पश्चिम रेल्वेने मायक्रो टनेलिंग कामे, ड्रेनेजची व्यापक दुरुस्ती, रुळांवरील नवीन ड्रेनेज प्रणालीचे बांधकाम आणि नाल्यांची साफसफाई, उच्च क्षमतेचे पंप आणि ड्रेनेज लगत सुरक्षा भिंत उभारल्याने रुळांवर पाणी येण्यास रोखण्यात यश आले. त्याचबरोबर चर्चगेट आणि विरारदरम्यान स्वयंचलित डिजिटल पर्जन्यमापक बसविले आहे. हे मशीन तापमान, दाब, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याची दिशा मोजते आणि सेक्शन इंजिनिअरला डिजिटल माहिती देते.
पम्पिंग स्टेशन सुरू करण्यास वेळच मिळाला नाही
मध्य रेल्वेवरील सर्व काम अंतिम टप्प्यात असल्याने सोमवारी झालेल्या मुसळधार पावसासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने तयार नव्हते.
हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ दिला होता, परंतु नंतर तो लगेचच ‘रेड अर्लट’ जाहीर करण्यात आला, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यामुळे सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पालिकेचे, तसेच रेल्वेचे कर्मचारी तत्काळ तैनात करता आले नाहीत.
सीएसएमटी आणि भायखळा येथे पम्पिंग स्टेशन उभारले असले, तरी ते सुरू करण्यासाठी रेल्वेला पुरेसा वेळ मिळाला नाही.
सकाळी ११:३० वाजता पम्पिंग स्टेशन सुरू केले, परंतु सकाळी ११:२४ दरम्यान समुद्राला आलेल्या भरतीमुळे फ्लड गेट बंद झाल्याने ते पुन्हा बंद करण्यात आले. परिणामी पाणी रुळांवर बराच काळ साचून राहिले.