“महायुती म्हणून ताकदीने पाठीशी राहू”; मुंबईत भाजपाचा महापौर होताच CM फडणवीसांनी दिला शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:28 IST2026-02-11T14:27:01+5:302026-02-11T14:28:12+5:30
CM Devendra Fadnavis First Reaction On BJP Ritu Tawde Mumbai Mayor Elected: महापौर, उपमहापौर आणि सगळे पदाधिकारी महापालिकेला एक दिशा देतील. सामान्य मुंबईकरांची स्वप्न पूर्ण करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

“महायुती म्हणून ताकदीने पाठीशी राहू”; मुंबईत भाजपाचा महापौर होताच CM फडणवीसांनी दिला शब्द
CM Devendra Fadnavis First Reaction On BJP Ritu Tawde Mumbai Mayor Elected: मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना- भारतीय जनता पक्ष महायुतीचे आमचे सदस्य महापौर आणि उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत. महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी हे महायुतीचे दोन्ही शिलेदार आहेत. या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याबद्दल लोकांकडे जी मते मागितली होती. मुंबईच्या जनतेने त्याला चांगला प्रतिसाद दिला, अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई मनपात भाजपाच्या महापौर रितू तावडे आणि शिंदेसेनेचे उपमहापौर संजय घाडी बिनविरोधात निवडून आले. या निवडीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून उपस्थित होते.
विशेषत: महापौर रितू तावडे यांचे अभिनंदन करतो. एक अनुभवी, अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी मागच्या काळातही मुंबईकरांच्या प्रश्नांकरिता आक्रमक भूमिका नेहमी घेतली आहे. मुंबईच्या विकासाचा कार्यक्रम महायुती सरकारने सुरू केला आहे, तो यापुढेही महानगरपालिकेच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जाईल, असा मला विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने...
उपमहापौर म्हणून जुने, जाणते अनुभवी शिवसैनिक संजय घाडी त्या ठिकाणी आहेत. त्यांच्याही अनुभवाचा फायदा निश्चित मिळेल. आमचा हा प्रयत्न असेल की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने, त्यांना अपेक्षित अशा प्रकारचे प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू. आमचे महापौर, उपमहापौर आणि सगळे पदाधिकारी मिळून या महापालिकेला एक दिशा देतील. सामान्य मुंबईकरांची स्वप्न ते पूर्ण करतील. त्याला पूर्ण ताकद देण्याचे काम महायुतीचे सरकार करेल. मी व एकनाथ शिंदे, पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे राहू. आपण जी नवी मुंबई घडवत आहोत, त्यांच्या माध्यमातून गती देण्याचे काम करू, असा शब्द फडणवीस यांनी दिला.
दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रोहित पवार काय बोलले ते मी ऐकलेले नाही. वेगवेगळ्या माध्यमांनी आणि व्यक्तींनी ज्या शंका उपस्थित केल्या, त्या त्यांनी मांडल्या. अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेची योग्यप्रकारे चौकशी व्हावी ही मागणी चुकीची नाही. रोहित पवार यांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबत मी एवढेच म्हणेन की जर कोणाच्या मनात काही शंका असेल तर त्या शंकेचे निरसन व्हायला हवे. या अपघाताची संपूर्णपणे नीट चौकशी आणि तपास व्हायला हवा अशी पत्र सर्वप्रथम मीच केंद्र सरकारला लिहिले होते.