राज्यसभेची मुदत २ एप्रिलला संपेल; खासदारकी, मंत्रिपद राहावे म्हणून रामदास आठवले महायुतीसोबत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 08:02 IST2026-01-07T08:00:42+5:302026-01-07T08:02:30+5:30
रामदास आठवलेंना आपली खासदारकी व मंत्रिपद सांभाळण्यासाठी महायुतीसोबत राहणे भाग पडल्याची चर्चा आहे.

राज्यसभेची मुदत २ एप्रिलला संपेल; खासदारकी, मंत्रिपद राहावे म्हणून रामदास आठवले महायुतीसोबत?
मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला मुंबई महापालिकेत भाजप व शिंदेसेनेतर्फे एकही जागा दिलेली नसतानाही आठवले मात्र महायुतीच्या प्रचारात सक्रिय आहेत. एकीकडे आठवलेंचे १२ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात असताना आठवलेंना आपली खासदारकी व मंत्रिपद सांभाळण्यासाठी महायुतीसोबत राहणे भाग पडल्याची चर्चा आहे.
आठवलेंतर्फे १७ जागांची मागणी करण्यात आली होती. पण, पक्षातर्फे १२ उमेदवार आता रिंगणात आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर भाजप व शिंदेसेना प्रत्येकी ६ प्रमाणे एकूण १२ जागा सोडतील, असा विश्वास आठवलेंकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, एकही जागा पक्षाला मिळाली नाही. त्यानंतरही आठवले महायुतीच्या प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित होते. आठवलेंची राज्यसभेची मुदत २ एप्रिलला संपुष्टात येत आहे, त्यामुळे खासदारकी व मंत्रिपद टिकवण्यासाठी आठवले भाजपसोबत असल्याची चर्चा रंगली आहे.
होत असलेले आरोप चुकीचे : पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे म्हणाले की, आठवलेंवर होत असलेले आरोप चुकीचे आहेत. आमच्या पक्षामुळे व आठवलेंमुळे मोठ्या प्रमाणात समाजाची मते महायुतीला मिळत आहेत. भाजपचे नेते याची योग्य ती दखल घेतील.