Join us  

Exclusive: भाजपची वाटचाल स्वबळाच्या दिशेने; २८८ मतदारसंघांमध्ये सुरू झाली 'शक्ती'चाचणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 5:15 AM

शिवसेनेने भाजप व लहान मित्र पक्षांसाठी १६८ ते सतत १७० जागा सोडण्याची तयारी दर्शवली तरच युती करावी करावी नाहीतर स्वबळावर लढावे, असा प्रभावी सूर पक्षसंघटना आणि सत्तेत असलेल्या भाजपजनांमध्ये आहे.

- यदु जोशीमुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी कोणत्याही परिस्थितीत युती केली जाईल असे भाजपचे राज्यातील नेते सांगत असले तरी दुसरीकडे भाजपने सर्व २८८ मतदारसंघांमध्ये स्वबळावर जोरदार तयारी चालवली आहे. येत्या वीस दिवसांत त्यादृष्टीने पक्ष संघटनेला कार्यक्रम देण्यात आला आहे. भाजपच्या प्रदेश विस्तारित कोअर कमिटीची बैठक दोन दिवसांपूर्वी मुंबईत झाली तीत सर्व २८८ मतदारसंघांवर सारखेच लक्ष केंद्रित करण्याचे आणि त्यादृष्टीने पक्ष संघटना सक्रिय करण्याचे निश्चित करण्यात आले.

भाजपने पाच ते सहा बूथ मिळून एका शक्तीकेंद्र प्रमुखाची नियुक्ती केली आहे. एकेका विभागातील पाच ते सहा हजार शक्ती केंद्र प्रमुखांची शिबिरे येत्या १५ दिवसांत राज्यभरात होणार आहेत. निवडणुकीच्या तयारीबाबत त्यात या प्रमुखांना मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय भाजपच्या विविध आघाड्या आणि सेलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मिळावे राज्यभर होणार आहेत. तसेच महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्यांमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची संमेलने होतील. एक बूथ प्रमुख आणि त्याची २५ जणांची टीम अशी बूथ पातळीवर भाजपची रचना असते. त्यांची जिल्हानिहाय संमेलने घेण्याची जबाबदारी पक्षाच्या मंत्र्यांना देण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांचाही त्यात समावेश असेल.

भाजपच्या इलेक्शन वॉररूममार्फत जिल्ह्याजिल्ह्यात सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी, भाजपची मतदारसंघातील परिस्थिती, विरोधी पक्षांची परिस्थिती, भाजप आमदाराची प्रतिमा, प्रत्येक मतदारसंघात पक्षाचे संभाव्य उमेदवार कोण असू शकतात याचा बारीकसारीक तपशील गोळा केला जात आहे. याशिवाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:ची सर्वेक्षण यंत्रणा राबवली आहे. त्यातून त्यांना दर दिवशी इनपुटस मिळत असतात.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि भाजपचे नेते यांच्यात प्रांतनिहाय बैठका सुरू आहेत. पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत एक बैठक झाली. काल औरंगाबादमध्ये अशीच बैठक झाली. या बैठकांमध्येही २८८ मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या दृष्टीने संघ-भाजप दरम्यान कसा समन्वय राखावा याबाबत चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ऐनवेळी युती झाली नाही तर सर्व जागा लढण्याची भाजपची तयारी असावी म्हणून मिशन मोडवर काम केले जात असल्याचे संकेत या सर्व घडामोडींवरून मिळत आहेत.शिवसेनेने भाजप व लहान मित्र पक्षांसाठी १६८ ते सतत १७० जागा सोडण्याची तयारी दर्शवली तरच युती करावी करावी नाहीतर स्वबळावर लढावे, असा प्रभावी सूर पक्षसंघटना आणि सत्तेत असलेल्या भाजपजनांमध्ये आहे. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की स्वबळावर लढण्याबाबत भाजपचे केंद्रातील नेतृत्व आग्रही आहे. शिवसेनेशिवाय तुम्हाला निवडून येता येत नाही का, असा सवाल भाजपच्या एका बड्या केंद्रीय नेत्याने महाराष्ट्रातून गेलेल्या काही नेत्यांना अलीकडे केला. त्यातून स्वबळाचा चर्चेला जोर आला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र युतीसाठी कमालीचे आग्रही आहेत. लोकसभेला युती केली ती चार महिन्यात कोणत्या आधारावर तोडायची? राजकारणात सगळे दिवस सारखे नसतात. शिवसेना आपली शत्रू नाही, असे ते युती तोडण्याचा आग्रह धरणाºया भाजपजनांना समजावून सांगत आहेत.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019महाराष्ट्रभाजपादेवेंद्र फडणवीस