मुंबई:शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की ओढवली. गेल्या पंधरा दिवसांमधील या घटनाक्रमांमुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. यानंतर आता शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. यावरून आता भाजपने टीकास्त्र सोडले आहे.
मोठ्या प्रमाणावर आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेल्याने आता त्यांच्या मागून नगरसेवक तसेच स्थानिक कार्यकर्ते जाऊ नयेत, यासाठी शिवसेना नेतृत्व मोठा निर्णय घेण्याचा तयारीत आहे. शिवसैनिकांनी शिवसेनेत एकनिष्ठ राहावे यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधण्याची कल्पना पुढे आणली होती. आता गेल्या काही दिवसांतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेच्या या निर्णयावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ते कधीही राष्ट्रवादीचे सदस्यत्व घेतील
सर्व प्रथम संजय राऊत यांचे शपथ पत्र घ्या, मग शिवसैनिकांचे. कारण संजय राऊत शरद पवार याच्या कुशीत जाऊन बसलेले आहेत. ते कधीही राष्ट्रवादीचे सदस्यत्व घेतील. त्यामुळे आधी काळजी घ्या, असा खोचक टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच संजय राऊत यांची ईडीने चौकशी केली, त्याबाबत विचारले असता, गीर गया तो भी टांग उपर, असे म्हणत, आपण सध्या कुठल्या प्रसंगाला सामोरे जातोय, याची जराही लाज शरम नाही. दुसऱ्याच्या घटनेवरून टीका करून संजय राऊत आनंद मानतात. देवेंद्र फडणवीस काय आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहेत, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
दरम्यान, आदरणीय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास असून, त्यांना आपला बिनशर्त पाठिंबा आहे, असा उल्लेख असलेलं प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांना लिहून द्यावं लागणार आहे. तसेच शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक आणि आमदारांसाठीही स्वाक्षरी मोहीम राबण्यात येणार आहे.