Join us  

आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही आता उघड झाला; अतुल भातखळकरांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 1:27 PM

भारतीय जनता पार्टी मोठे जन आंदोलन उभारेल व गरज पडल्यास उच्च न्यायालयात सुद्धा जाणार असल्याचा इशारा सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

मुंबई- आपले तथाकथित पर्यावरण प्रेम दाखवत मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड आरे मधून इतरत्र हलविणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरे मध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहिर करून आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान चालविले आहे, हे अत्यंत संतापजनक असून मंत्री आदित्य ठाकरे व महाविकास आघाडी सरकारचे पर्यावरण प्रेम हे पूर्णतः  बोगस व बेगडी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

आरमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाची मनाई असताना सुद्धा ठाकरे सरकारने आरेमधील तब्बल 32310 वर्ग फूटाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहिर केला. इतकेच नव्हे तर हा परिसर परि-संवेदनशील क्षेत्र असताना सुद्धा केवळ बिल्डरांच्या सोबत असलेल्या 'आर्थिक' संवादातून हा प्रकल्प करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे. आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही उघड झाला आहे. मुंबईकरांचे भले करणारी मेट्रो कारशेड नको, मात्र बिल्डरांचे उखळ पांढरे करून टक्केवारची सोय करणारी SRA योजना हवी, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मुंबईकरांना फायद्याचा असणारा मेट्रो कारशेड प्रकल्प खोटी कारणे देत आरे येथून इतरत्र हलवून मुंबईकरांचे नुकसान केले, पण आता स्वतः सह बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठीच ठाकरे सरकारचे हे उद्योग सुरू आहेत. याविरोधात भारतीय जनता पार्टी मोठे जन आंदोलन उभारेल व गरज पडल्यास उच्च न्यायालयात सुद्धा जाणार असल्याचा इशारा सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरेअतुल भातखळकरभाजपामेट्रोआरेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार