Join us  

"आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का?"; भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 7:12 PM

BJP Chitra Wagh Slams Thackeray Government : भाजपाने (BJP) ठाकरे सरकारवर यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. 

मुंबई - दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्लीपोलिसांनी उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी काल ६ दहशतवाद्यांना अटक केली. प्राथमिक तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात आणखी दहशतवादी असणाऱ्याची शक्यता तपाय यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यासोबत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी काही जणांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. त्यानुसार त्यांचा मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा इरादा होता, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर आता भाजपाने (BJP) ठाकरे सरकारवर (Thackeray Government) यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का?" असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "दिल्ली पोलीस येऊन मुंबईतील आतंकवादी पकडताहेत मग आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का??" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दिल्लीत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनंतर स्वत: दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना थेट मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांची मुंबई पोलीस आयुक्तांसोबत बैठक सुरू असून चौकशीत त्यांना मिळालेली माहिती ते मुंबईच्या आयुक्तांना देत आहेत. 

"संजय राऊत, तुम्ही मुंबईचे पोलीस आयुक्त कधीपासून झालात? ही धडपड कुणासाठी?"

चित्रा वाघ यांनी सामनातील अग्रलेखावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "संजय राऊत यांचा सामनातला अग्रलेख म्हणजे स्त्रीबाबत असणाऱ्या तालिबानी प्रवृतीचं उदाहरण" असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "मला सामनाच्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरे यांना हेच विचारायचं आहे की तुमचा कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी अमानवीय घटनेचा वापर राजकारणातील हेव्या-दाव्यांसाठी करतो आहे. अशा तालिबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार...?" असा सवाल देखील वाघ यांनी विचारला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"संजय राऊत यांचा सामनातला अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील स्त्रीबाबत असणाऱ्या तालिबानी प्रवृतीचं हे उदाहरण आहे. अहो राऊत. एका महिलेवरती अमानवीय अत्याचार झालेला आहे. त्यामुळे तिचा ज्या यातनेने मृत्यू झाला असेल. तुम्हाला ते या जन्मातही समजणार नाही. अशा दुर्दैवी घटनेवरती राजकारणाची पोळी भाजण्यासाठी तिचा वापर करता आणि महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशची तुलना करता. नाकर्तेपणा तुमचा गुणधर्म झालेला आहे. फक्त भावनिक गप्पा झोडायच्या आणि मग घटनेनंतर म्हणायचे…ताई, घाबरू नका.. चिंता करू नका…हल्लेखोरांना शिक्षा होईल... आणि फक्त अशी भावनिक भुरळ घालायची...असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

 

टॅग्स :चित्रा वाघदिल्लीपोलिसमुंबई पोलीसउद्धव ठाकरेराजकारणभाजपा