भाजप उमेदवार मत'श्रीमंत'; बोरीवलीच्या जिज्ञासा शाह यांच्या पारड्यात २६,०८८ मतांचे दान
By सीमा महांगडे | Updated: January 19, 2026 12:26 IST2026-01-19T12:26:07+5:302026-01-19T12:26:07+5:30
प्रभाग २० मध्ये काँग्रेसचे तुलीप मिरांडा यांचा सात मतांनी विजय

भाजप उमेदवार मत'श्रीमंत'; बोरीवलीच्या जिज्ञासा शाह यांच्या पारड्यात २६,०८८ मतांचे दान
सीमा महांगडे
मुंबई : महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बोरिवलीतील प्रभाग क्रमांक १५ कोरा केंद्र येथील भाजप उमेदवार जिज्ञासा शाह यांना सर्वाधिक २६,०८८ मते मिळाली आहेत. शाह यांनी उद्धवसेनेच्या उमेदवार जयश्री बंगेरा यांचा २१ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला आहे. तर, प्रभाग क्रमांक १४० टाटानगर येथील एमआयएमचे उमेदवार विजय उबाळे यांना सर्वात कमी ४,९९५ मते मिळाली. प्रभाग ९० पी अॅण्ड टी कॉलनीतील काँग्रेसच्या उमेदवार अॅड. तुलीप मिरांडा यांचा अवघ्या सात मतांनी, तर प्रभाग १२१ आयआयटी पवई येथील उद्धवसेनेच्या प्रियदर्शिनी ठाकरे यांचा १४ मतांनी विजय झाला आहे.
यंदा महापालिका निवडणुकीत ५२.९४ टक्के मतदान झाले. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ५५.५८ टक्के मतदान झाले होते. मत टक्क्यातील ही घट महायुतीच्या पथ्यावर पडली आहे.
यंदा कुलाब्यातील प्रभाग क्रमांक २२७ नाथलाल पारेख मार्ग येथे सर्वात कमी म्हणजे २०.८८ टक्के मतदान झाले. या प्रभागात ४६ हजार ३६ मतदार आहेत. तर प्रभाग क्रमांक ११४ क्रांतीनगर या भांडुपमधील प्रभागात सर्वाधिक ६४.५३ टक्के मतदानाची नोंद झाली. या प्रभागात ३९ हजार ५९७ मतदार आहेत.
कोणत्या पक्षाला किती मते ?
मुंबईतील ५४ लाख ७४ हजार ४१२ मतदारांनी (५३ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. टपाली मतांची संख्या ११ हजार ६७७ होती. हे दोन्ही मिळून यातील सर्वाधिक ४५.२२ टक्के मते भाजपला, २७.५२ टक्के मते उद्धवसेनेला, त्याखालोखाल १०.४८ टक्के मते शिंदेसेनेला मिळाली आहेत.