Join us  

बिहार विजयाने भाजपचा आत्मविश्वास वाढला; राज्यात ऑपरेशन लोट्सची पुन्हा चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 12:46 AM

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी होते

मुंबई : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रातील भाजपचा आत्मविश्वास वाढण्यास मदत तर होईलच परंतु पक्षातील संभाव्य आऊटगोईंगला चाप बसेल, असे मानले जात आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आणखी काही भाजप नेते राष्ट्रवादीच्या गळाला लागतील, असा दावा केला जात होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व अजूनही लोकप्रियता राखून आहे आणि भाजपला केवळ बिहारमध्येच नव्हे तर अन्य राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतही भरघोस यश मिळाले हे लक्षात घेता भाजप सोेडून जाणे राजकीय शहाणपणाचे होईल का याचा विचार कुंपणावरील नेते नक्कीच करतील, असे म्हटले जाते. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले की कालच्या निकालाने भाजप सोडण्यास कोणी धजावेल, असे वाटत नाही.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी होते. ऐन निवडणुकीच्या काहीच दिवस आधी कोरोनाबाधित झाल्याने त्यांना मुंबईला परतावे लागले तरीही ते सातत्याने तेथील प्रचार रणनीती ठरविण्यात महत्त्वाची भूमिका वठवत होते. बिहारमध्ये भाजपने यश मिळविल्याने फडणवीस यांची पक्षातील उंची वाढेल, असे मानले जाते.

बिहारमधील निवडणूक यशानंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोट्स’  होणार का, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र भाजप सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावत राहील, असे सांगितले. बिहार व पोटनिवडणुकीतील निकालाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, असे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. 

टॅग्स :भाजपादेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकार