BJP And Thackeray Group News: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे उद्धव ठाकरे पदाधिकारी, नेत्यांच्या बैठका घेताना पाहायला मिळत आहेत. तसेच ठाकरे गट मनसे सोबत युती करण्यासही सकारात्मक असून, याबाबत नेमका कधी निर्णय जाहीर होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच एकामागून एक माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जात असतानाच आता ठाकरे गटाच्या दोन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष आणि मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्यांना प्रवेश देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार प्रविण दरेकर, मुंबई भाजपा उपाध्यक्ष कमलाकर दळवी उपस्थित होते.
१०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश
आशिष शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याचा अर्थ त्यांनी ठाकरे गटाचे नेतृत्व नाकारले आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पाहायला मिळेल, असे सूतोवाचही आशिष शेलार यांनी केले.
दरम्यान, ठाकरे गटाची अवस्था धोकादायक आणि जीर्ण झाली आहे. त्यांनी मुंबई, मुंबईकर, हिंदुत्व, हिंदू सण उत्सव यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे ते धोकादायक स्थितीत आहेत. २०१७ च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाला फक्त दोन जागा कमी होत्या आता भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर १ चा पक्ष झाला. याशिवाय मूळ शिवसेनेतील ५० हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेत. त्यामुळे ठाकरे सेना हा पक्ष अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे, अशी टीका शेलार यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला ५ लाख कोटींचा निधी दिला. आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरू आहे, असेही ते म्हणाले.