Bharat Bandh : मनसेकडून ‘अच्छे दिन’ची अंत्ययात्रा; 50 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 11:56 IST2018-09-10T10:58:52+5:302018-09-10T11:56:41+5:30
Bharat Bandh: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह 21 राजकीय पक्षांनी आज भारत बंद पुकारला आहे. या आंदोलनाला मुंबई शहरासह अनेक ठिकाणी समिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Bharat Bandh : मनसेकडून ‘अच्छे दिन’ची अंत्ययात्रा; 50 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह 21 राजकीय पक्षांनी आज भारत बंद पुकारला आहे. या आंदोलनाला मुंबई शहरासह अनेक ठिकाणी समिश्र प्रतिसाद मिळत आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दादरमध्ये शिवसेना भवन परिसरात ‘अच्छे दिन’ची अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जवळपास 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे, चेंबूरमधील वाशी नाका परिसरात काही कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान बेस्टच्या बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. तसेच, प्रतिक्षानगर बस डेपोमध्ये सुद्धा काही बसची तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या घटनेत बसच्या काचा फुटल्या असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. याशिवाय, चेंबूरमध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, चेंबूर नाका येथे डायमंड पेट्रोल पंपावर मनसेने अनोखे आंदोलन केले. यावेळी मनसेने पेट्रोलपंपावर गाढव आणले आणि आंदोलन केले.
(Bharat Bandh : मुंबईतील शाळा, महाविद्यालये सुरूच राहणार!)
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. अशोक चव्हाणयांच्यासहीत सर्व काँग्रेस नेते, कार्यकर्त रेल्वे रुळावर उतरले आणि यावेळी त्यांनी लोकल अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अशोक चव्हाणांसोबत माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह अन्य नेतेमंडळीही उपस्थित होते.
(Bharat Bandh Live Updates: 'भारत बंद'ला सुरुवात; देशभरात काँग्रेसची निदर्शनं)
मोदी सरकारचे अपयश जनतेपुढे मांडणार
या बंदच्या माध्यमातून, आधी चार राज्यांत विधानसभेच्या व नंतर लोकसभेची निवडणूक होणार असताना, मोदी सरकारचे अपयश जनतेपुढे मांडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. ''देशात इंधनाचे भाव दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे, अशा वेळी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. सोमवारचा ‘भारत बंद’ त्यासाठीच आहे. देशभरातील व्यापारी वर्गाने त्याला उत्स्फूर्तपणे साथ द्यावी, असे आवाहन करीत माकन म्हणाले, बंदच्या काळात कोणत्याही प्रकारची हिंसक घटना होणार नाही, बंद शांततेत पार पडेल, याची आम्ही दक्षता घेतली आहे'', असे दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.