मुंबई : गिरगावात मेट्रो स्थानकाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता खचल्याची घटना घडली. खचलेल्या रस्त्यात बेस्टची बस अडकली.गिरगाव येथे प्रस्तावित पुनर्वसन इमारतीच्या तळघरात पाणी झिरपत असल्याचे आढळून आले आहे. इमारतीच्या बांधकामाच्या जवळच कुठेतरी पाणी गळती होत असल्याची शक्यता मुंबई मेट्रो रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे. त्यामुळे जमिनीचा काही भाग खचून खाली पोकळी निर्माण झाली. त्यामुळे ही घटना घडली असल्याची शक्यता आहे.
सकाळपासून मुंबईला पावसाने झोडपून काढले आहे. सकाळी साडे नऊच्या सुमारास बाबासाहेब जयकर मार्ग ठाकूरद्वार चौक येथे मेट्रो स्थानकाचे काम सुरू असलेल्या ठिकाणाहून बस जात असताना रस्ता खचला. बसचे मागचे एक चाक या खड्ड्यात गेल्यामुळे बस जागीच अडकून पडली. त्यामुळे प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. बस अडकल्याने वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झालेला नाही असे बेस्ट प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
टोइंग व्हॅनच्या साहाय्याने बस खड्ड्यातून बाहेर काढून आगारामध्ये परत नेण्यात आली. बस १२१ क्रमांकाच्या बसमार्गावरील बॅकबे आगारातील होती. गेल्या महिन्यात २६ मे च्या पावसात वरळी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी ही घटना घडली. मेट्रो प्रशासन महानगरपालिकेच्या समन्वयाने पाण्याच्या वाहिन्या, गटार किंवा पावसाच्या नाल्यांमधील गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करण्याचे काम करत आहे.