राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 19:31 IST2020-01-23T19:28:58+5:302020-01-23T19:31:09+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन मुंबईत पार पडत आहे.

राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात बदलली, जमलेल्या माझ्या तमाम ...
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आपल्या भूमिकेतील बदल दाखवून दिल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिल्यांदाच पक्षाचं अधिवेशन घेण्यात येत आहे. पुढील दोन महिन्यात मनसेच्या स्थापनेला 14 वर्षे पूर्ण होत आहेत, याची आठवणही राज यांनी आपल्या भाषणात करून दिली. तसेच, झेंडा आवडला का? असा प्रश्नही राज यांनी कार्यकर्त्यांना विचारला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन मुंबईत पार पडत आहे. या महाअधिवेशनात ढोल ताशांच्या गजरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं. मनसेच्या राजकीय वाटचालीत प्रथमच दिवसभराचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करुनच आपला अजेंडा स्पष्ट केला.
"जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो......" नी राजसाहेबांच्या भाषणाला सुरुवात #महाअधिवेशन
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 23, 2020
जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो असे म्हणत राज यांच्या भाषणाची सुरुवात होत होती. मात्र, पक्षाचं नवनिर्माण करताना राज ठाकरेंनी पक्षाचा झेंडा अन् अजेंडाही बदलल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. कारण, राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच, जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो... असे म्हणत आपल्या भाषणातील सुरुवातीचा बदल दाखवून दिला. ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करायचे, अगदी तशीच राज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यामुळे, राज यांचे हिंदवी स्वराज्य हे बाळासाहेबांच्या संघटनेप्रमाणेच चालणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.