Join us

वांद्रे मॉल आगीची वर्दी अग्निशमन दलाकडे दीड तासाने, सुरक्षा रक्षक, व्यवस्थापक यांच्यावर अहवालात ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:32 IST

Bandra Mall Fire: वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलला लागलेल्या आगीचा अहवाल महापालिकेच्या दक्षता विभागाने आयुक्तांना सादर केला आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली, याचा कोणताही निष्कर्ष अहवालात नसला तरी तेथे उपस्थित सुरक्षा रक्षक कर्मचारी व व्यवस्थापकांनी अग्निशमन दलास कळवण्यास दीड तासाचा वेळ घेतल्याचा गंभीर ठपका त्यात ठेवण्यात आला आहे.

मुंबई - वांद्रे लिंक स्क्वेअर मॉलला लागलेल्या आगीचा अहवाल महापालिकेच्या दक्षता विभागाने आयुक्तांना सादर केला आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली, याचा कोणताही निष्कर्ष अहवालात नसला तरी तेथे उपस्थित सुरक्षा रक्षक कर्मचारी व व्यवस्थापकांनी अग्निशमन दलास कळवण्यास दीड तासाचा वेळ घेतल्याचा गंभीर ठपका त्यात ठेवण्यात आला आहे. मॉलमधील आग विझवणारी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने आग भडकली, असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे.

२९ एप्रिल रोजी रात्री अडीच वाजता मॉलला भीषण आग लागली होती. या आगीत मॉल खाक झाला होता. त्यानंतर आगीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी पालिकेने सह आयुक्त (दक्षता) यांची नियुक्ती केली होती. २ मे रोजी त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. आग का पसरली आणि आग विझवण्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबली यादृष्टीने त्यांनी चौकशी केली. अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित ठेवणे  ही त्या वास्तूच्या मालकांची जबाबदारी असताना तशी यंत्रणा कार्यान्वित नव्हती. त्यामुळे लिंक स्क्वेअर को. ऑप. सोसायटीने नेमणूक केलेल्या इंडियन फायर सिस्टीम यांच्यात दोष असल्याचे आढळून आले. लिंक स्क्वेअर यांनी प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांना ६ जानेवारी रोजी पत्र पाठवून इंडियन फायर सिस्टीमची अग्निशमन सुरक्षा यंत्रणेचे परीक्षण करण्यासाठी नियुक्ती केल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर चार महिन्यांनंतर आग लागल्यानंतर अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्याचे आढळून आले, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

अहवालातील शिफारस  मॉलचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. धोकादायक  स्थितीत आलेला भाग त्वरित तोडावा. इंडियन फायर सेफ्टी सिस्टीम यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. लेव्हल  ३ ते ४ चा कॉल घेण्यास लागलेला कालावधी हा मोठा असल्याने संबंधितांकडून स्पष्टीकरण मागवावे. 

आग नेमकी कशामुळे पसरली ? मॉलमध्ये मोबाइल, इलेक्टॉनिक वस्तू, रेडिमेड गारमेंट, कॉस्मेटिक होते. तळघरात यांत्रिक वायुविजनाची यंत्रणा चालू नव्हती. स्प्रिंक्लरला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद होती. इमारत चारही बाजूने काचेच्या तावदानाने बंद. आग सकाळी अडीच वाजता लागली. मात्र, अग्निशमन दलाला  पहाटे ३ वाजून ५८ मिनिटांनी कळवले, परंतु अग्निशमन दलाने लेव्हल १ च्या आगीचा कॉल ४ वाजून १७ मिनिटांनी, लेव्हल २ फायरचा कॉल ४ वाजून २८ मिनिटांनी, लेव्हल ३ चा कॉल ४ वाजून ४९ मिनिटांनी व लेव्हल ४ चा कॉल ६ वाजून २५ मिनिटांनी देण्यात आला. त्यावरून लेव्हल १ ते लेव्हल ४ चा कॉल घेण्यास लागलेला कालावधी जवळपास दोन तासांपेक्षा जास्त असल्याचे आढळले.

टॅग्स :मुंबईआगअग्निशमन दल