सजग पालकांनो, लहान मुलांचा लठ्ठपणा वेळीच रोखा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:36 IST2025-04-05T13:35:59+5:302025-04-05T13:36:15+5:30
Child Health: गेल्या काही वर्षांत आधुनिक जीवनशैलीचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. सध्याच्या काळात विशेषत: कोरोनाकाळापासून मुलांचे मैदानी खेळ बंद झाले असून व्हिडीओ गेम, मोबाइल आणि लॅपटॉपवरील स्क्रीन टाइम वाढला आहे.

सजग पालकांनो, लहान मुलांचा लठ्ठपणा वेळीच रोखा!
मुंबई - गेल्या काही वर्षांत आधुनिक जीवनशैलीचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. सध्याच्या काळात विशेषत: कोरोनाकाळापासून मुलांचे मैदानी खेळ बंद झाले असून व्हिडीओ गेम, मोबाइल आणि लॅपटॉपवरील स्क्रीन टाइम वाढला आहे. त्यातही जंक फूडमुळे मुलांची आहारशैलीही बदलली आहे. त्यामुळे लठ्ठपणा वाढीस लागल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
लठ्ठपणामुळे कोवळ्या वयात मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवू लागल्याने पालकांसाठी ते चिंतेचे कारण बनले आहे. हा प्रश्न इतका गंभीर झाला आहे की, अनेक लहान मुलांच्या रुग्णालयांत लठ्ठपणावरील उपचारासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. खाण्याच्या चुकीच्या सवयीं बरोबर जेनेटिक आणि हॉर्मोनल बदल हेदेखील लठ्ठ पणाच्या कारणांमध्ये भर घालतात. मात्र योग्य वेळी उपचार केल्यास लठ्ठपणा कमी होऊ शकतो. गेल्या काही वर्षांपासून लठ्ठपणा हा आजार असून त्यामुळे विविध रोग उद्भवत नाअसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातून लहान वयात मुलांमध्ये श्वसनविकाराच्या व्याधी बळावत आहेत. यासाठी मुलांना पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे.
मुंबईची मुले लठ्ठ
तीन वर्षांपूर्वी राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत लठ्ठपणा जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये इयत्ता सातवी ते नववीमध्ये शिकणाऱ्या १४ हजार २७८ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी ५४० विद्यार्थी लठ्ठ असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे मुंबईतील ज्या ९५४ विद्यार्थ्यांची तपासणी यावेळी करण्यात आली, त्यातील १५९ मुले लठ्ठ आढळून आली आहेत. हे प्रमाण १६ टक्के असून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ते अधिक असल्याचे दिसून आले होते.
लठ्ठपणास हे कारणीभूत
तळलेले पदार्थ
चॉकलेट
सॉफ्ट ड्रिंक
हवाबंद डब्यातील पदार्थ
साखर व मीठ जास्त असलेले पदार्थ
व्हिडीओ गेम, मोबाइल आणि लॅपटॉपवर खेळत राहणे
लठ्ठपणामुळे मुलांवर शस्त्रक्रिया करण्याची गरजच लागू नये यासाठी प्रयत्न व्हायला आहे. जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाल्यास शस्त्रक्रिया हा अतिशय शेवटचा पर्याय असू शकतो. मूल गुटगुटीत असणे आणि सुदृढ असणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. मात्र मोठेपणातील समस्या जर शाळेच्या वयातच भेडसावायला लागल्या, तर संपूर्ण आयुष्य अडचणीत येऊ शकते.
- डॉ. राहुल बोरुडे
स्थूलत्व शल्यचिकित्सक, फोर्टीस रहेजा हॉस्पिटल