"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:34 IST2026-01-01T13:32:21+5:302026-01-01T13:34:31+5:30
भाजपाचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या उत्तर भारतीय महापौर बसवण्याच्या विधानावरून मुंबईत राजकीय शिमगा रंगला आहे. या विधानावरून उद्धवसेना-मनसे युतीने भाजपाला घेरले. मंत्री नितेश राणे यांनीही हिंदूच्या मुद्द्यावरून पलटवार केला.

"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे भाजपा आणि ठाकरे बंधू आमने-सामने आले आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांना घेरताना दिसत आहे. त्यामुळे राजकारणाचा पारा वाढला आहे. अशातच भाजपाचे नेते कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या विधानाने मनसे-उद्धवसेनेच्या हाती आयताच मुद्दा मिळाला आहे. त्याला उत्तर देताना भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी 'हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते', असे म्हणत पलटवार केला आहे.
'उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू', असे विधान भाजपाचे नेते कृपाशंकर सिंह यांनी मीरा भाईंदरमध्ये बोलताना केले. त्यांच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि निवडणुकीच्या रणधुमाळी मराठी विरुद्ध उत्तर भारतीय वादाला फोडणी मिळाली.
"भाजपाचं ठरलं, मुंबईचा महापौर उपराच"
उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आधी कृपाशंकर सिंह यांचा व्हिडीओ ट्विट करत भाजपावर निशाणा साधला. "भाजपाचे ठरले, मुंबईचा महापौर उपराच! मराठी माणसा जागा हो", असे राऊत म्हणाले.
माध्यमांशी बोलतानाही राऊतांनी भाजपाला सुनावले. ते म्हणाले, "मुंबई किंवा इतरत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, हा भाजपाचा अजेंडा आहे. भाजपाचे हे कारस्थान आहे. वातावरण निर्मिती करण्यासाठी भाजपाने कृपाशंकर सिंह यांची नेमणूक केली आहे. कृपाशंकर सिंह हा भाजपाचा पोपट आहे. भाजपा आधी वातावरण निर्मिती करून चाचपडून पाहतात."
"भाजपाने मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचा असे ठरवले आहे. भाजपाला मुंबई जिंकण्यासाठी बाहेरचे लोक लागतात. भाजपा आणि शिंदेगट यांच्यासारखे डुप्लिकेट पक्ष आहेत", अशी टीका राऊतांनी केली.
नितेश राणे म्हणाले, "ठाकरे गटाला मिरची झोंबली"
भाजपाचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी उद्धवसेनेकडून झालेल्या टीकेला उत्तर दिले. "जितकी मिरची ठाकरे गटाला उत्तर भारतीय महापौरची लागली, तितकी मिरची बुरखेवाली महापौर बनेलची का लागली नाही?", अशा शब्दात राणेंनी उद्धवसेनेला डिवचले.
"यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते. बाकी, मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार! मुंबई. महादेव.", असे उत्तर नितेश राणे यांनी उद्धवसेनेला दिले.