Join us  

'मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुलडोझर सरकार?'; अमृता फडणवीसांचा पलटवार

By मुकेश चव्हाण | Published: October 15, 2020 2:58 PM

पुन्हा अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महिला आघाडीला शेरो-शायरीच्या अंदाजात उत्तर दिले आहे. 

मुंबई: मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात लेटरवॉर सुरू झाल्यानं राजकारण तापलं आहे. मंदीरं उघडण्याबाबत यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहे. याचदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविका आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यानंतर आता पुन्हा अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महिला आघाडीला शेरो-शायरीच्या अंदाजात उत्तर दिले आहे. 

'वाह प्रशासन! बार आणि दारूची दुकानं सुरू आहेत. मग मंदिरं डेंजर झोन आहेत का? काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते,' अशा खोचक शब्दांत अमृता फडणवीस यांनी  उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. यानंतर मुंबई महापालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी अमृता यांचा एकेरी उल्लेख करत शरसंधान साधलं. 'ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का? ती कधी राजकारणात आली? नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर ती बोलू लागली,' असं विशाखा राऊत म्हणाल्या होत्या. शिवसेनेची राजकारणातली ही चौथी पिढी आहे. उगाच प्राणी वगैरे म्हणून टीका करू नका. आम्ही संस्कृती जपतोय. आम्ही जर तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही,' असं प्रत्युत्तर विशाखा राऊत यांनी अमृता फडणवीसांना दिलं होतं. यानंतर आता पुन्हा अमृता फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारवर पलटवार केला आहे.

“मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुलडोझर सरकार?” असं म्हणत अमृता फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बुलडोझर चालवले होते. त्यावरुन कंगनाने राज्य सरकारला बुल्डोजर चालवणारी सरकार म्हणून संबोधले होते. यावरुन अमृता फडणवीस यांनी टीका केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, राज्य सरकार मंदिरं भाविकांसाठी का खुली करत नाहीत, असा सवाल राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना पत्रातून केला होता. त्यातबरोबर, उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही डिवचले होते. उद्धव ठाकरेंनीही राज्यपालांना माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा सडेतोड उत्तर दिलं होतं.

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही,अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला उत्तर दिले. तसेच महाराष्ट्राला अथवा राज्याच्या राजधानीला, पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत-खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.

‘मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का?’ असा प्रश्न राज्यपालांनी पत्रात विचारला होता. त्यावर ठाकरे म्हणतात, आपल्याला असा प्रश्न का पडावा? आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र मी एवढा थोर नाही. केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे ‘सेक्युलर’ असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्वाचा गाभाच ‘सेक्युलर’ आहे, तो आपल्याला मान्य नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना केला आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेअमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्र सरकारशिवसेना