अजितदादा विमान अपघात, तपासात हलगर्जीपणा; व्हीएसआर कंपनीवर सरकार मेहरबान का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 09:38 IST2026-03-24T09:38:40+5:302026-03-24T09:38:40+5:30
या चर्चेत सहभागी होताना तुपे यांना अजितदादांच्या आठवणीने गहिवरून आले.

अजितदादा विमान अपघात, तपासात हलगर्जीपणा; व्हीएसआर कंपनीवर सरकार मेहरबान का?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला विलंब होत असून, अजूनही व्हीएसआर कंपनीच्या मालकावर कारवाई झालेली नाही. व्हीएसआर कंपनीविषयी तक्रारी असूनही कंपनीवर सरकार मेहरबान का? या कंपनीला अद्याप काळ्या यादीत का टाकले नाही? असे सवाल करत अजित पवार गटाच्या चेतन तुपे यांनी विधानसभेत अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप केला. अपघाताचे सत्य समोर येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
अजित पवारांच्या अपघातप्रकरणी शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी विधानसभेत नियम २९३अन्वये चर्चा उपस्थित केली आहे. या चर्चेत सहभागी होताना तुपे यांना अजितदादांच्या आठवणीने गहिवरून आले.
चेतन तुपे म्हणाले, मुंबईत सकाळी साडेसात वाजेपर्यंत रस्त्यावर कुठेही वाहतूक कोंडी नसते. मग अशावेळी नियोजित वैमानिक वाहतूक कोंडीत अडकला म्हणून ऐनवेळी विमानाचा पायलट आणि क्रू का बदलण्यात आला? ऐनवेळी पायलट बदलणे हे संशयास्पद आहे. एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर कोण? त्याचे नाव काय? की एका विमानाऐवजी दुसरे विमान दिले, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे.