Join us

वातावरणीय बदलाच्या संकटाचे कृषी पदवीधरांनी संधीत रूपांतर करावे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 14:20 IST

Dhananjay Munde News: आजच्या शेतीसमोर वातावरणातील बदलाचे प्रमुख संकट आहे. कृषी विद्यापीठातून पदवीधर घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी वातावरणीय बदलाच्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

मुंबई -  आजच्या शेतीसमोर वातावरणातील बदलाचे प्रमुख संकट आहे. कृषी विद्यापीठातून पदवीधर घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी वातावरणीय बदलाच्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू तथा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. डॉ पंजाबराव देशमुख विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभाला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.

 धनंजय मुंडे म्हणाले की, कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जनाचे काम संपले असले तरी वास्तविक जीवनात त्यांची खरी परीक्षा आजपासून सुरू होणार आहे. भारत सरकारने नुकतेच एम. एस. स्वामीनाथन यांना नुकतेच मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले आहे. कै स्वामीनाथन यांनी वेगवेगळ्या वाणांचे संशोधन करून देशातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवली व देशासमोरील अन्नधान्याचे संकट दूर केले. त्यांची प्रेरणा घेऊन काम केल्यास तुमच्यातूनच एखादा स्वामीनाथन तयार होऊन देशासमोरील मोठ्या अडचणींचे निराकरण करू शकतो असा विश्वास श्री मुंडे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाने नुकताच गुगल बरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात भागीदारीचा करार केला आहे. या कराराचा सर्वात मोठा फायदा कृषी क्षेत्राला होणार आहे. आगामी काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असल्यामुळे कृषी पदवीधरांनी त्यासंबंधीच्या ज्ञानाचे पंख लावल्यास ते निश्चितपणे मोठी भरारी घेऊ शकतील.आपल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना करून द्यावा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न पाहिले आहे यामध्ये महाराष्ट्राचे आणि कृषी क्षेत्राचे मोठे योगदान असणार आहे. कृषी विद्यापीठातील विद्यार्थी हे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करतील असाही विश्वास मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

 या समारंभारास राज्यपाल  रमेश बैस दूरदृश्य प्रणालीद्वारे तसेच कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. झेड. पी. पटेल, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रा मणी, महाराष्ट्र कृषी व मत्स्य विद्यापीठाचे डॉ. नितीन पाटील, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. शरद गडाख माजी कुलगुरू पद्मश्री मोतीलाल मदन, एस. एन. पुरी व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :धनंजय मुंडेशेती क्षेत्रमहाराष्ट्र सरकार