मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 20:16 IST2025-06-29T20:16:15+5:302025-06-29T20:16:34+5:30
सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी मराठी माणसाने यातून बोध घ्यायला हवं असं म्हटलं.

मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
Raj Thackeray: राज्यात त्रिभाषा सुत्रावरुन सुरु असलेल्या वादादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाऊ नये यासाठी विरोधकांनी सर्वपक्षीय मोर्चाची तयारी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधेला पत्रकार परिषद घेत हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा केली. मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चाआधीच सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले. तसेच एका समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या शासन निर्णयानंतर आता मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षांनी हा मोर्चा रद्द केल्याचे सांगितले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमधून मराठी जनतेच्या रेट्यामुळेच हिंदीची सक्ती मागे घेण्यात आल्याचे म्हटलं आहे. तसेच हा निर्णय कायमचा रद्द झाला असून समितीचा अहवाल काहीही आला तरी असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
हिंदी भाषेसाठी सरकारवर कुठून दबाव होता?
"इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे. पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले.
...तर समितीला महाराष्ट्रात काम करू देणार नाही
"अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी. हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी," असाही इशारा राज ठाकरे यांनी दिला.
तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत
"आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये. त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे. असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा. मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन," असं राज ठाकरेंनी म्हटलं.