मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाने अखेर २६ मे रोजी मुंबईत आपली ‘ॲडव्हान्स एन्ट्री’ केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. त्यातही मान्सूनच्या दमदार एंट्रीमुळे सोमवारी दिवसभरात मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून आले. गेल्या २४ वर्षांत मान्सून प्रवेशाची सर्वात लवकर अशी नोंद ठरली आहे.
सोमवारचा दिवस पावसाच्या रौद्र रूपासह उजाडल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. सकाळी ११ वाजेपर्यंत नरिमन पॉइंट परिसरात अतिवृष्टी झाल्याचे स्पष्ट झाले. तेथे सकाळी ९ ते १० अशा अवघ्या एका तासांत तब्बल १०४ मिमी पावसाची नोंद झाली, तर मध्यरात्रीपासून सकाळी ११ पर्यंत पावसाने २०४ मिमीची पातळी गाठली. मुंबई शहर व उपनगरात रात्रीपासून सुरू असलेला जोरदार ते अतिजोरदार पाऊस आणि समुद्रास सकाळी ११:२४ वा. असलेली ४.७५ मीटरची भरती यामुळे मुंबई अनेक ठिकणी पाणी भरले.
हवामान विभागाने मुंबईसाठी २७ मे रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक गोष्ट नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने मुंबईकरांना केले आहे. पावसामुळे केम्प्स कॉर्नरजवळ रस्ता खचण्याचा प्रकारही समोर आला आहे.
मध्यरात्रीपासून व सकाळी ११ वाजेपर्यंत पावसाची नोंद (मि.मी.मध्ये)नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्र २५२ए विभाग कार्यालय २१६महापालिका मुख्यालय २१४कुलाबा उदंचन केंद्र २०७नेत्र रुग्णालय, दोन टाकी २०२सी विभाग कार्यालय (मरीन लाइन्स) १८०मेमनवाडा अग्निशमन केंद्र १८३ब्रिटानिया उदंचन केंद्र, वरळी १७१नारियलवाडी शाळा, सांताक्रूझ १०३सुपारी टँक, वांद्रे १०१जिल्हाधिकारी वसाहत, चेंबूर ८२एल विभाग कार्यालय, कुर्ला ७६
मुंबई, ठाण्यात आज यलो अलर्ट
मुंबईत या आधी २७ मेपर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. मान्सून रविवारी तळ कोकणात व दुसऱ्या दिवशी सोमवारी मुंबईत दाखल झाला. पहिल्याच दिवशी तो जोरदार कोसळला. त्यामुळे सोमवारी सकाळी हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट दिला होता. मात्र, दुपारी यात बदल करत मुंबई, ठाण्यासाठी रेड अलर्ट दिला, तर मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.