पाणी निचऱ्यासाठीचा कृती आराखडा केंद्र सरकारकडे सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 10:28 IST2026-05-20T10:27:57+5:302026-05-20T10:28:24+5:30
पावसाळापूर्व तयारीचा एक भाग म्हणून मुंबईतील लोकप्रतिनिधींनी रे रोड येथ ब्रिटानिया पर्जन्य जल उदंचन केंद्र, वरळी येथील लव्हग्रोव्ह पर्जन्य जल उदंचन केंद्र आणि क्लिव्हलँड पर्जन्य जल उदंचन केंद्रांची मंगळवारी पाहणी केली.

पाणी निचऱ्यासाठीचा कृती आराखडा केंद्र सरकारकडे सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळ्यात शहर व उपनगरात सखल भागांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा जलद आणि परिणामकारक निचरा व्हावा, यासाठी महापालिकेने ‘आयआयटी’च्या माध्यमातून सर्वंकष कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. केंद्रीय निधीतून आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष व आ. अमित साटम यांनी दिली.
पावसाळापूर्व तयारीचा एक भाग म्हणून मुंबईतील लोकप्रतिनिधींनी रे रोड येथ ब्रिटानिया पर्जन्य जल उदंचन केंद्र, वरळी येथील लव्हग्रोव्ह पर्जन्य जल उदंचन केंद्र आणि क्लिव्हलँड पर्जन्य जल उदंचन केंद्रांची मंगळवारी पाहणी केली. यावेळी मुंबई उपनगरे जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, आ. साटम व पालिकेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
उदंचन केंद्रांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळतो. त्यामुळे ही केंद्रे योग्य पद्धतीने कार्यान्वित आहेत का, याची पाहणी करण्यात आली. याखेरिज, पाणी उपसा करण्यासाठी मुंबई महानगरात विविध ठिकाणी ५५० हून अधिक उदंचन संच तैनात करण्यात आले आहेत.
ही कामे प्रगतिपथावर
सध्या हाजी अली (महालक्ष्मी), इर्ला (जुहू), लव्हग्रोव्ह (वरळी), क्लिव्हलँड (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड), गझदरबंध (सांताक्रूझ) अशी ६ उदंचन केंद्रे कार्यरत आहेत.
तर, माहुल (चेंबूर) आणि मोगरा (वेसावे) येथील दोन उदंचन केंद्रांची कामे प्रगतिपथावर आहेत, असे महापौरांनी सांगितले.
अंधेरी सब-वे पावसाळ्यात जलमयच..!
दरवर्षी पावसाळ्यात मोगरा नाला भरून वाहू लागल्यानंतर अंधेरी सब-वे जलमय होतो. कंबरेइतके पाणी साचल्याने रस्ते वाहतूक बंद होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत आहे. मात्र, प्रशासनाला अद्यापही यश आलेले नाही. पावसाळा तोंडावर आला असल्याने अंधेरी सब-वेच्या जलकोंडीवर आता पावसाळ्यानंतरच मार्ग काढला जाईल. दरम्यान, व्यवहार्य पर्यायांची चाचपणी सुरूच राहील, अशी माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली. या काळात आवश्यक ती पम्पिंग यंत्रणा लावून सब-वे जलमय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे त्या म्हणाल्या.