मुंबईत मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे, तो मुंबईबाहेर जाता कामा नये; एकनाथ शिंदेंचं विधान
By मुकेश चव्हाण | Updated: January 4, 2023 19:55 IST2023-01-04T19:52:57+5:302023-01-04T19:55:01+5:30
मराठी साहित्य संमेलनाच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईत मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे, तो मुंबईबाहेर जाता कामा नये; एकनाथ शिंदेंचं विधान
मुंबई: विश्व मराठी संमेलनास राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातील नव्या शहरांमध्ये हे संमेलन भरविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 'मराठी तितुका मेळवावा' या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे आज मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया, वरळी येथे उद्घाटन झाले, त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
मुंबईमध्ये मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे. मराठी माणूस या मुंबईमधून बाहेर जाता कामा नये. मुंबईतून बाहेर गेलेल्या मराठी माणसालादेखील मुंबईत परत कसे आणता येईल, यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. आज मुंबईतले हे विश्व संमेलन खऱ्या अर्थाने आपल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याची एक सुरुवात आहे, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
जी भाषा सर्वांना जोडते, जी भाषा सर्वांना सामावून घेते आणि जी भाषा जात, धर्म, पंथ पलीकडची माणुसकी शिकवते, माणुसकी जपते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते आणि हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरलेले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा, यासाठी केंद्राकडे देखील पाठपुरावा करण्यात येत आहे. मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, तसेच मराठी साहित्य संमेलनाच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विश्व मराठी संमेलनासाठी देश-विदेशातून आलेल्या सर्व मराठी भाषा प्रेमींचे मनःपूर्वक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे#विश्वमराठीसंमेलनpic.twitter.com/qHZ3uuj9IU
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 4, 2023
मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाने आज जगभरामध्ये सगळीकडे यशाची शिखरं गाठतोय आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण गेलो तरी मराठी भाषा कानावर पडते. या सर्व मराठी माणसांना एकत्र आणणारा दुवा म्हणून हे विश्व मराठी संमेलन आहे. मराठी भाषा आणि आपले सण, उत्सव जगभरातील मराठी माणसांना एकत्र जोडून ठेवतात, त्यामुळे गणेशोत्सव साजरा केल्याशिवाय आपल्या मराठी बांधवांना चैन पडत नाही. गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये कोरोनामुळे सगळे कामकाज ठप्प होते. आता सगळे सुरू झाले आहे, सर्व सण आपण आनंदाने एकत्रितपणे साजरे करत आहोत, असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
वरळी, मुंबई येथे आयोजित 'विश्व मराठी संमेलन २०२३'च्या उद्घाटन कार्यक्रमातून लाईव्ह https://t.co/LfhwMtN4sA
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 4, 2023